शक्तीपीठ महामार्गासाठी सुधारित अधिसूचना जारी; कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुके, ७८ गावांचा समावेश
By संदीप आडनाईक | Updated: May 7, 2026 23:16 IST2026-05-07T23:16:01+5:302026-05-07T23:16:01+5:30
करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

शक्तीपीठ महामार्गासाठी सुधारित अधिसूचना जारी; कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुके, ७८ गावांचा समावेश
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: वर्धा ते सिंधुदुर्ग (पत्रादेवी) दरम्यान प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवारी सुधारित अधिसूचना जारी केली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७८ गावांचा या महामार्गात समावेश करण्यात आला आहे. यांमध्ये करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महामार्गाचे नवीन संरेखन (अलायमेंट) निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध अधिसूचनेनुसार हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे सुमारे ८०२.६ किलोमीटर लांबीचा असून, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणार आहे. हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान उभारण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कोल्हापूर, राधानगरी, गगनबावडा, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील ७८ गावांमधून महामार्गाचे संरेखन करण्यात आले आहे. दरम्यान, सुधारित अधिसूचनेनंतर पुन्हा एकदा शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महामार्गासाठी सुपीक शेती, वनक्षेत्र तसेच काही ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला काही भागांतून तीव्र विरोधही सुरू आहे. राजपत्रातील माहितीनुसार, पूर्वीच्या अधिसूचनेतील काही गावांच्या सीमांमध्ये आणि संरेखनात बदल करण्यात आले असून, त्यानुसार नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.