Kolhapur ZP Election Results 2026: सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने मदत मागितली तर विचार करू - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:21 IST2026-02-10T12:20:46+5:302026-02-10T12:21:45+5:30
काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारकच; पुढची खेळी आता कशी सांगणार

Kolhapur ZP Election Results 2026: सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने मदत मागितली तर विचार करू - सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला आमची गरज पडेल असे वाटत नाही. महायुतीतील घटक पक्षांना ते सोबत घेतील. मात्र, त्यातूनही काही वेगळं होऊन सत्तास्थापनेसाठी त्यांनी काँग्रेसकडे मदत मागितली तर विचार करू, अशी भूमिका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार, दोन मंत्री, एक खासदार व सत्ता असतानाही काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सतेज पाटील म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने १५, स्वाभिमानी, उद्धवसेना व शिवशाहू आघाडीचा प्रत्येकी १, अशा १८ जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार, दोन मंत्री आहेत. तिन्ही पक्षांची ताकद एकवटली असतानाही काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारक आहे.
महाडिकांनी गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले
सहकारातील निवडणुका वेगळ्या असतात. गोकुळ, जिल्हा बँक या संस्था चांगल्या चालविल्या आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये पक्षविरहित राजकारण असेल, असेही आमदार पाटील म्हणाले. गोकुळमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे हित पाहतो, महाडिकांनी मात्र गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले, असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
पुढची खेळी आता कशी सांगणार
करवीर तालुक्यातील १२ जागांपैकी ५ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. पुढच्या विधानसभेसाठी ही तयारी आहे का? असा प्रश्न विचारताच आमदार पाटील यांनी माझी विधानपरिषदेची मुदत डिसेंबर २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे पुढची खेळी आता कशी सांगणार, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली. करवीर मतदारसंघात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली मते घेतल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पाटील, सूर्यवंशींना आमचे प्रस्ताव, पण...
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा पाडळीमधून पराभव झाला असला तरी पाटील यांना पाडळीतून व राजेंद्र सूर्यवंशी यांना सांगरूळमधून लढण्याचा प्रस्ताव होता. ते आमच्याकडून उभारले असते तर या दोन्ही जागा आरामात जिंकल्या असत्या. मात्र, पाटील यांना शिंदेसेनेच्या बाजूची समीकरणे वाटल्याने त्यांनी तो निर्णय घेतला. पण शेवटी लोकांनाही काही निर्णय मान्य असावे लागतात. ते ५० वर्षे काँग्रेससोबत राहिले होते, अचानक पक्ष बदलल्याने त्याचा फटका त्यांना बसला असेल, असे आमदार पाटील म्हणाले.