निसर्गाच्या सानिध्यातून मनुष्याची उत्क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:59+5:302021-01-21T04:22:59+5:30
कोल्हापूर : मनुष्याची उत्क्रांती निसर्गाच्या सानिध्यातच झाली आहे. त्यामुळेच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली असून ती माणसाची सहज प्रवृत्ती आहेए ...

निसर्गाच्या सानिध्यातून मनुष्याची उत्क्रांती
कोल्हापूर : मनुष्याची उत्क्रांती निसर्गाच्या सानिध्यातच झाली आहे. त्यामुळेच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली असून ती माणसाची सहज प्रवृत्ती आहेए असे मत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला यांनी व्यक्त केले. करवीरनगर वाचन मंदिर येथे थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मुल्ला यांच्याशी अरण्यरंगतून डाॅ. अमर अडके यांनी सुसंवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार जोशी होते.
मुल्ला म्हणाले, अरण्याच्या वाटेवर जाताना प्रत्येक गोष्ट नवी अनुभूती देणारी व मनाला आनंद देणारी आहे. त्यासोबतच हुलकावणी देणारी आहे. येथील जैवविविधता निसर्गाशी एकरूप असते. त्याची अनुभूती अरण्यात फिरल्याशिवाय कळत नाही. अनेकदा एक वन्यप्राणी जीव वाचविण्यासाठी, तर दुसरा वन्यजीव त्याचा जीव घेण्यासाठी आक्रमक होतात. निसर्गाच्या चक्राप्रमाणे अरण्यातील अनुभूती असते. सुंदर दिसणारी फुलपाखरेही अनेकदा विषारी असतात. कारण काही वनस्पतींवर त्यांच्या अळ्या किंवा अंडकोष तयार करतात. त्याचा परिणाम त्यांचे शरीर विष निर्मिती करते. निसर्गामध्ये अगम्य गोष्टी ईश्वराने निर्माण केल्या आहेत. प्रत्येक जीव परजीवावर अवलंबित आहे. हे अरण्यातील चक्र एकमेकांवर आधारित आहे. अनेकदा पक्षीही स्वसंरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या घरट्याचा आधार घेतात. जंगलातून येणारा आवाजांचा उलगडाही मुल्ला यांनी अनेक किस्से सांगून या सुसंवादातून केला. परिचय संस्थेचे संचालक उदय सांगवडेकर यांनी, तर सूत्रसंचालन मनीषा शेणई यांनी केले. अश्विनी वळिवडेकर यांनी आभार मानले.
फोटो : २००१२०२१-कोल- करवीर नगर
ओळी : कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिरात सुरु असलेल्या वि. स. खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत गुरुवारी दुसरे पुष्पा गुंफताना युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला यांनी अरण्यरंगतून संवाद साधला. यावेळी डाॅ. अमर अडके उपस्थित होते.