घर देण्याचे सांगून साई माऊली बिल्डरने ६४ जणांना घातला ९३ लाखाचा गंडा
By मुरलीधर भवार | Updated: April 23, 2026 20:09 IST2026-04-23T20:08:51+5:302026-04-23T20:09:22+5:30
खोणी-काटई मार्गालगत असलेल्या धामटण गावात घरे देण्याचे आमिष

घर देण्याचे सांगून साई माऊली बिल्डरने ६४ जणांना घातला ९३ लाखाचा गंडा
- मुरलीधर भवार
कल्याण : खोणी-धामटण गावात स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून साई माऊली बिल्डरने ६४ जणांना गंडा घातला आहे. ९३ लाख ८० हजार ६४ जणांकडून उकळले आहे. आत्ता साई माऊली बिल्डरने धूम ठोकली आहे. त्याच्या कार्यालयास टाळे आहे.
फसवणूक झालेल्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. मानपाडा पोलिसांनी साई माऊली बिल्डरच्या विरोधात ६४ जणांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जान्हवी प्रॉपर्टी या नावाने इंस्टाग्राम साई माऊली बिल्डरने जाहिरात केली होती. या जाहिरातीला भुलून नागरीकांनी त्याच्याकडे घर खरेदीची रक्कम जमा केली.
या प्रकरणी डोंबिवलीत राहणारी आचल गुप्ता या गृहीणीने मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. आचल यांनी इंस्टाग्रामवर जाहिरात पाहिली होती. या जाहिरात वन-बीएचके ५ लाख रुपये आणि २ बीएचके ७ लाख रुपये किंमतीत घर दिले जाईल. जान्हवी प्रॉपर्टी या नावाने इंस्टाग्रामवर ही जाहिरात होती. आचल यांनी संबंधित साई माऊली बिल्डरशी संपर्क साधला. खोणी-काटई मार्गालगत असलेल्या धामटन गावात घरे बांधली जात आहे. त्याठिकाणी घरे दिले जातील. आचल यांनी घर बुक केले. बिल्डरच्या कार्यालयातील कदम नामक व्यक्ताने त्यांच्याकडून जीपे आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात २ लाख ८५ हजार रुपये घेतले. त्यांना घराची चावी घेण्यासाठी बोलविले. ११ एप्रिल रोजी घराची चावी घेण्यासाठी आचल गेल्या असता त्याठिकाणी बिल्डरच्या कार्यालयास कुलुपू होते. आचल यांच्या प्रमाणे अन्य जणांनाही त्याठिकाणी घराचे पैसे भरले होते. त्यांचीही बिल्डरने अशा प्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले. आचल यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठले. आचल यांच्यासह फसवणूक झालेल्या ६४ जणांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे साई बिल्डरशी संबंधित सचिन संभाजी सुर्वे, निखील कडलक, रविंद्र यादव यांच्यासह कदम आणि वाघमारे या ५ जणांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ-खाेणी-काटई परिसरात बेकायदा चाळी उभारून त्या विकण्याचा सपाटा भूमाफिया आणि बिल्डरांनी लावला आहे. नेवाळी परिसरात ब्रिटीशकाली एरोड्रमच्या जागेवर बेकायदा चाळी बांधण्यात आल्या आहे. ही जागा स्वातंत्र्य भारतात शेतकरी वर्गाला परत करण्यात आलेली नाही. या प्रकरणी नेवाळीत शेतकरी आणि भूमीपूत्रांनी मोठे आंदोलन केले होते. कल्याण ग्रामीण भागातील बेकायदा चाळी प्रकरणातून दहा वर्षापूर्वी असंख्य नागरीकांची फसवणूक झाली होती. जवळपास २५ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी तत्कालीन पोलिस उपायुक्तांनी एसआयटी नेमली होती. त्याचा पुढे काही तपास झाला नाही. आत्ता सोशल मिडियावर बेकायदा चाळीतील घरांची जाहिरात करुन बेकायदा घरे विक्री करुन सामान्यांची लाखो रुपयांची फसणूक केली जात आहे.