मोडकळीस आलेल्या रेल्वेच्या इमारती जमिनदोस्त करा ! डॉ. नीलम गोऱ्हे : पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदेसेनेने स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:24 IST2026-05-19T09:24:28+5:302026-05-19T09:24:53+5:30
रेल्वे हद्दीतील सर्व धोकादायक इमारती तातडीने जमिनदोस्त कराव्यात, तसेच रेल्वे यार्ड परिसरात सर्चलाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनाला केल्या.

मोडकळीस आलेल्या रेल्वेच्या इमारती जमिनदोस्त करा ! डॉ. नीलम गोऱ्हे : पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदेसेनेने स्वीकारली
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर विधान परिषदेच्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. रेल्वे हद्दीतील सर्व धोकादायक इमारती तातडीने जमिनदोस्त कराव्यात, तसेच रेल्वे यार्ड परिसरात सर्चलाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनाला केल्या.
पोलिस प्रशासनासोबत त्यांनी बैठक घेतली. पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदेसेनेने घेतली आहे. खटल्यात चांगला वकील देण्याची सूचना केली आहे. बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकाद्वारे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, सीसीटीव्हीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर, पोलिस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे, सहायक आयुक्त नंदराज पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे व महिला आघाडीच्या विजया पोटे आदी बैठकीला उपस्थित होेते.
यार्डात सुरक्षा रक्षक हवेत
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील पडीक इमारती आणि यार्डात रात्रीच्या वेळी कोणी नसते. अशावेळी तिथे सुरक्षा रक्षक ठेवले पाहिजेत पडीक इमारती रेल्वेने पाडल्या पाहिजेत. २०२१ मध्ये निर्देश दिल्यानंतर काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या, असेही आमदार निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
३८ पोक्सो न्यायालये सुरू
राज्यात मंजूर झालेल्या १४० पोक्सो न्यायालयांपैकी ३८ न्यायालये सुरू झाली असून उर्वरित न्यायालये न्यायाधीश उपलब्ध होताच कार्यान्वित करण्यात येतील. त्यासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पॅरोलवरील सराईतांची यादी करावी
बदलापूर प्रकरणात आरोपीचा एन्काउंटर झाला. त्यात अनेक पोलिस निलंबित झाले. लोकांची भावना आहे की लवकर शिक्षा व्हावी, ती योग्य आहे. एन्काउंटर करणे ही घटनेच्या चौकटीतील भूमिका असू शकत नाही, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
कोरोनात पॅरोलवर बाहेर आलेले अनेक सराईत गुन्हेगार हद्द सोडून बाहेर गेले त्याचाच परिणाम म्हणून नसरापूरची घटना घडली, असे त्या म्हणाल्या.