युवावर्गाने लोकशाहीच्या मुल्यांची जोपासना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 08:00 PM2021-01-25T20:00:18+5:302021-01-25T20:01:42+5:30

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम संपन्न :  जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी

The youth should cherish the values of democracy | युवावर्गाने लोकशाहीच्या मुल्यांची जोपासना करावी

युवावर्गाने लोकशाहीच्या मुल्यांची जोपासना करावी

Next

 जळगाव - सुदृढ लोकशाहीमुळे देशाचा विकास होत असल्याने लोकशाहीची मुल्ये जोपासली व जतन केली पाहिजे. याकरीता तरुणांनी जागरुक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी आज केले.

            येथील नियोजन भवनात 11 वा राष्ट्रीय मतदार दिवसाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना न्या. जगमलानी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पद्मश्री निलिमा मिश्रा, कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 न्या. जगमलानी पुढे म्हणाले की, बहुमतावरच लोकशाहीचा पाया मजबूत असतो. त्यामुळे युवावर्गाने मतदान प्रक्रियेत आपला अधिकाधिक सहभाग नोंदवून  राष्ट्रीय विकासात आपले योगदान दिले पाहिजे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी  राऊत म्हणाले की, सध्याचा काळ हा डिजिटलचा आहे. प्रत्येक मतदार हा जागरुक व्हावा याकरीता अनेक साधने उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगही विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. शिवाय मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देत आहे. अशावेळी मतदारांनी आपली नोंदणी करुन मतदानाचे कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणीची अधिक प्रभावी जनजागृती व्हावी, याकरीता ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक नागरीकाने आपली मतदार नोंदणी करुन लोकशाही सशक्तीकरणाचा दूत बनावे. असे आवाहनीर त्यांनी केले.

 पद्मश्री निलिमा मिश्रा म्हणाल्या की, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांसोबतच सर्व नागरीकांनी मतदानाबाबत जागरुक राहिले पाहिजे. कुलगुरु प्रा. पाटील म्हणाले, भारतीय लोकशाही उज्वल परंपरा आहे. ती अधिक बळकट झाली पाहिजे याकरीता प्रत्येक पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करुन मतदान केले पाहिजे. मतदार नोंदणीसाठी विद्यापीठ नेहमी आघाडीवर राहिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ मुंढे म्हणाले की, लोकशाहीसाठी अनेक देशात लढे लढले गेले आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट आहे, ती अधिक सुदृढ होण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य भावनेने तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमाची रुपरेषा या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या व राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

 यावेळी युवा मतदार रजनी सोनवणे, निखील सपकाळे, राष्ट्रपती पुरस्कारी विजेती दिव्यांग मतदार विद्या विजय शेटे, योगेश शेटे, मनोज साळवे, अथांग कोसोदे, हर्षल हेमंत बढे यांना डिजिटल ओळखपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर मतदार नोंदणी मोहिमेत उत्कृष्ठ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O) कैलास थोरवे, यशवंत गुजर, सचिन बेलदार, पियुष जोशी यांचा तर स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल माजी सैनिक किशोर मगन पाटील, संजीव बारवकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, दिव्यांग मतदार आयकॉन मुकुंद गोसावी, विनोद ढगे यांचा तर प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेत्या अश्विनी कुलकर्णी, भावेश रोहीमारे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्तेदीपप्रज्वलनाने करण्यात आली. मतदार दिन कार्यक्रमाचे डिजिटल पध्दतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाकडील संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञेचे वाचन केले. या कार्यक्रमाचे facebook.com/JalgaonDM या जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या फेसबुक पेजवरुन प्रसारण करण्यात आले.

            कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, तहसिलदार नामदेव पाटील, सुरेश थोरात, नायब तहसीलदार कळसकर यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विनोद ढगे यांच्या चमुने मतदार जनजागृतीचे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अपर्णा वाणी यांनी तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी मानले.

Web Title: The youth should cherish the values of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.