तब्बल सात वर्षांनी रावेर रेल्वे मालधक्क्याचे अखेर भाग्य खुलले केळी  निर्यातीच्या "जीएस-एसएलआर" किसान रॅकने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 10:16 PM2021-04-04T22:16:13+5:302021-04-04T22:17:42+5:30

अखेर किसान रॅकच्या जीएस एसएलआर रॅकला केळीमाल भरताना गजबजला.

After seven years, the fate of Raver railway cargo has finally been revealed. | तब्बल सात वर्षांनी रावेर रेल्वे मालधक्क्याचे अखेर भाग्य खुलले केळी  निर्यातीच्या "जीएस-एसएलआर" किसान रॅकने

तब्बल सात वर्षांनी रावेर रेल्वे मालधक्क्याचे अखेर भाग्य खुलले केळी  निर्यातीच्या "जीएस-एसएलआर" किसान रॅकने

Next
ठळक मुद्देकेंद्रीय रेल्वे बोर्डाने रावेर व सावदा रेल्वे स्थानकांवर दर आठवड्याला २४ जीएस एसएलआरच्या दोन किसान रॅकला मान्यता सोमवारी पहाटे चार वाजता पहिल्या किसान रॅकचे प्रस्थान 

 किरण चौधरी
रावेर : तब्बल सात वर्षांपासून केळी निर्यातीअभावी सुनसान पडलेल्या रावेर रेल्वेस्थानकावरील रेल्वे मालधक्का कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना रावेर रेल्वे स्टेशन केळी फळबागायतदार युनियनच्या अथक प्रयत्नांनंतर व खासदार रक्षा खडसे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे  अखेर किसान रॅकच्या जीएस एसएलआर रॅकला केळीमाल भरताना गजबजला. केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी व केळी कामगार मजूरांमधून आनंद व्यक्त होत आहे. रावेर रेल्वे मालधक्क्यावरून १७ जीएस एसएलआरमध्ये १ हजार ५३० क्विंटल तर सावदा मालधक्क्यावरून ७ जीएस एसएलआरमध्ये ६३० क्विंटल असा शेतकरी व व्यापार्‍यांचा एकूण २ हजार १६० क्विंटल केळीचा पहिला रॅक ट्रक भाड्यापेक्षा ४३० रू प्रतिक्विंटल कमी भाड्याने व जलदगतीने दिल्लीसाठी सोमवारी पहाटे चारला रवाना होईल.
        रावेर, सावदा व निंभोरा रेल्वे स्थानकावरील केळी मालधक्क्यावर रेल्वे निर्यातीसाठी बोगी रॅक, बीसीएन वॅगन्स रॅक, व्हीपीयू वॅगन्सचा रॅक व एअर सर्क्युलेटेड हॉर्टीकल्चर ट्रेन्सचे रॅक केळीच्या निर्यातीसाठी काळानुरूप भरण्यात आले. मालवाहतुकीची बोगी वा बीसीएन वॅगन्समध्ये भरलेली केळी ३६ तासांच्यापुढे उष्णतेमुळे काळी पडून खराब होवून नवी दिल्ली वा कानपूर तथा लखनौ करीता होत असे. दरम्यान, व्हीपीयू वॅगन्स रॅक २४ तासात दिल्लीत पोहचू लागल्याने केळी मालाचा दर्जा काहीअंशी बर्‍यापैकी पोहचत होता. तथापि, राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळ व कॉन्कोरच्या माध्यमातून केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या पुढाकाराने एअर सर्क्युलेटेड हॉर्टीकल्चर ट्रेनमधून ताजीतवाणी केळी अवघ्या २० तासात दिल्लीला निर्यात होत होती. मात्र कालांतराने राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळाने भाडे सवलतीचे अनुदान बंद केल्याने सन २०१४ पासून या तीनही मालधक्क्यावरून केळी निर्यात बंद पडली होती. 
रावेर व सावदा रेल्वे स्टेशन केळी फळबागायतदार युनियनने केळीची रेल्वे वाहतुकीसाठी तगादा लावून धरल्याने व खासदार रक्षा खडसे यांनी विशेषत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फळभाज्या वाहतुकीसाठी सुरू केलेल्या किसान रॅकची थेट उपलब्धता करून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला. परिणामी केंद्रीय रेल्वे बोर्डाने रावेर व सावदा रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर किसान रॅकचे "जीएस-एसएलआर" असे एकूण २४ सेकंड क्लास मालवाहतुकीचे डबे उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता दिली. 
      त्या अनुषंगाने रविवारी सायंकाळी सातला रावेर रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर किसान रॅकचे १७ जीएस एसएलआरचे डबे तर सावदा मालधक्क्यावर ७ जीएस एसएलआरचे डबे दाखल झाले. रावेर रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर रावेर केळी फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील, उपाध्यक्ष किशोर गणवानी, सचिव अॅड.आर. आर.पाटील, सुरेश गणवानी, नितीन गणवानी व विनायक महाजन यांनी आपापल्या डब्यांचे पूजन करून १० टन केळीमाल भरण्याची क्षमता असताना दंडात्मक कारवाई नको म्हणून केवळ नऊ टन केळीमाल भरत असल्याची माहिती उपाध्यक्ष किशोर गणवानी यांनी दिली. ५ एप्रिल रोजी पहाटे चाररला जीएस एसएलआर रेल्वे डब्यांचा पहिला किसान रॅक २ हजार १६० क्विंटल अर्थात २१६ टन केळीमालाची नया आझादपूर दिल्लीसाठी रवानगी होणार आहे. कोरोनाच्या या महामारीत फळभाज्या वाहतुकीसाठी प्राधान्याने सुरू करण्यात आलेल्या किसाम रॅकने खर्‍या अर्थाने या सात वर्षांपासून धुळखात पडलेल्या रेल्वे मालधक्क्याला पुनर्जिवीत केले असून आठवड्यातून दोन दिवस या किसान रॅकला हिरवी झेंडी मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. 
 
केळी निर्यातीसाठी प्रतिक्विंटल ४३० रू ने ट्रकपैक्षा भाडे कमी... 
 
रावेर ते दिल्लीसाठी नऊ टन केळीमाल वाहतुकीसाठी ५४ हजार रुपये भाडे रोखीने मोजून द्यावे लागत असताना सावदा व रावेर केळी फळबागायतदार युनियनच्या तथा खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी अवघ्या १५ हजार ३७७ रू भाडे एका जीएस एसएलआर डब्याला बसणार आहे. परिणामी ३८ हजार ६२३ रू भाडे नऊ टन केळीमाल वाहतुकीसाठी ट्रकपेक्षा कमी बसणार असल्याने प्रतिक्विंटल केळी भाडे ४२९.१४ रू कमी भाडे बसणार असल्याची माहिती केळी युनियनचे उपाध्यक्ष किशोर गणवानी यांनी दिली. यावेळी रावेर रेल्वेस्थानक व्यवस्थापक राजेशकुमार यादव यांनी आठवड्यातून दोन दिवस या किसान रॅकला कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली असून, तब्बल २० तासात किसान रॅक नया आझादपूर येथे दाखल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: After seven years, the fate of Raver railway cargo has finally been revealed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.