...तर जागतिक व्यवस्था धोक्यात येईल, इराणचा इशारा; पाकिस्तानी पंतप्रधानांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:56 IST2026-03-11T14:54:42+5:302026-03-11T14:56:25+5:30
इराणच्या राष्ट्रपतींनी जागतिक समुदायाला चालू युद्धाच्या विनाशकारी परिणामांकडे त्वरित लक्ष देण्याचे आणि जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन केले

...तर जागतिक व्यवस्था धोक्यात येईल, इराणचा इशारा; पाकिस्तानी पंतप्रधानांशी साधला संवाद
इस्लामाबाद - इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत जागतिक सुरक्षेबाबत गंभीर इशारा दिला आहे. जर आंतरराष्ट्रीय समुदाय युद्धासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्यात अयशस्वी ठरला तर जागतिक व्यवस्था पूर्णपणे धोक्यात येऊ शकते असं पेझेश्कियान यांनी म्हटल्याचं इराणी सरकारी मीडियाने प्रसारित केले आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामागे ज्यांची भूमिका आहे त्यांना दुर्लक्ष केल्याने जागतिक व्यवस्था अस्थिर होऊ शकते यावर त्यांनी भर दिला.
इराणच्या राष्ट्रपतींनी जागतिक समुदायाला चालू युद्धाच्या विनाशकारी परिणामांकडे त्वरित लक्ष देण्याचे आणि जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती असताना इराण आणि पाकिस्तान यांच्यात संवाद झाला आहे. ट्रम्प यांचं गुणगान गाणे, सौदी अरेबियाशी मजबूत संबंध तयार करणे आणि इराणशी फोन कॉलवरून शांतता राखणे अशी खेळी पाकिस्तान युद्धापूर्वी खेळत होता. परंतु काही काळच त्यांचा फॉर्म्युला चालला. त्यानंतर अमेरिका, इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांना मारले. आखातात मिसाईल हल्ले केले त्यामुळे पाकिस्तानला सावध पवित्रा घ्यावा लागला.
पाकिस्तानसमोर ३ मोठी आव्हाने
शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान एकाच वेळी ३ संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानला सौदी अरेबियासोबत झालेल्या संरक्षण करारात समतोल साधायचा होता. इराणमध्ये खामेनेई यांच्या मृत्यूनंतर देशात संतापलेल्या शिया मुस्लिमांना शांत करायचे आहे. जे एकूण लोकसंख्येच्या २० टक्के आहेत. त्याशिवाय असं कुठलेही पाऊल उचलायचे नाही ज्यातून अमेरिकेसोबत तयार झालेले संबंध पुन्हा बिघडतील. त्यामुळे ही ३ आव्हाने पाकिस्तानसमोर उभी राहिली आहे.
अफगाणिस्तानशी युद्धामुळे पाकिस्तानची वाढली डोकेदुखी
सध्या पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढला आहे. शेजारी देश इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे प्रादेशिक परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्यात अफगाणिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षातून पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे एकाचवेळी पाकिस्तानला वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. म्हणून पाकिस्तान आता अफगाणिस्तानशी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे.