पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मोठा मास्टरस्ट्रोक; बांगलादेशने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:45 IST2026-02-20T18:36:47+5:302026-02-20T18:45:03+5:30
बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलले आहे.

पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मोठा मास्टरस्ट्रोक; बांगलादेशने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय
बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलले आहे. मोहम्मद यूनुस यांच्या सरकारने दोन महिन्यांपूर्वी भारतीयांसाठी स्थगित केलेली व्हिसा सेवा तारिक रहमान यांनी पुन्हा बहाल करण्याचा आदेश दिला आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय भारतीयांना सर्व श्रेणीतील व्हिसा देण्यास पुन्हा सुरुवात करणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
काय होता 'यूनुस सरकार'चा निर्णय?
डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मोहम्मद यूनुस सरकारने भारतीयांसाठी पर्यटन आणि वैद्यकीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. केवळ बिझनेस आणि वर्क व्हिसा सुरू ठेवण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटनावर आणि राजनैतिक संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, बीएनपी प्रणीत नवीन सरकार सत्तेत आल्याच्या अवघ्या तीन दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला आहे.
सर्व श्रेणीतील व्हिसा सेवा बहाल
आता भारतीय नागरिकांना बांगलादेशात जाण्यासाठी पर्यटन, वैद्यकीय आणि इतर सर्व प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. तारिक रहमान यांच्या या निर्णयाकडे भारतासोबतचे संबंध पुन्हा रुळावर आणण्याचा एक सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात आहे.
भारतही व्हिसा सेवा सुरू करण्याच्या तयारीत
दुसरीकडे, बांगलादेशातील भारतीयांसाठी व्हिसा सेवा सुरू झाल्यानंतर आता भारतानेही बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यास सुरुवात केली आहे. सिलहटमधील भारताचे वरिष्ठ अधिकारी अनिरुद्ध दास यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशी नागरिकांसाठी मेडिकल आणि डबल-एंट्री व्हिसा सध्या दिले जात आहेत आणि लवकरच पर्यटन व्हिसाची प्रक्रियाही सामान्य होईल. "भारत-बांगलादेश संबंध परस्पर आदर आणि सामायिक हितावर आधारित आहेत," असेही त्यांनी नमूद केले.
तणावाचे सावट दूर होणार?
डिसेंबर २०२५ मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर आणि चटगाव येथील भारतीय सहायक उच्चायुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. यामुळे दोन्ही देशांनी आपापल्या व्हिसा सेवा मर्यादित केल्या होत्या. मात्र, आता तारिक रहमान यांच्या पंतप्रधानपदी आगमनानंतर दोन्ही देशांमधील व्हिसा वॉर संपण्याची चिन्हे आहेत.