उड्डाण रद्द झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेल एक्सटेंशन मोफत; अबु धाबी सरकार देणार खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:59 IST2026-03-02T08:59:15+5:302026-03-02T08:59:55+5:30
जे पर्यटक प्रवासी या परिस्थितीत फसले आहेत त्यांच्या राहण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क लादले जाऊ नये. अतिरिक्त खोल्यांचा खर्च आमच्याकडून भागवला जाईल असे सरकारने निर्देश दिले आहेत.

उड्डाण रद्द झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेल एक्सटेंशन मोफत; अबु धाबी सरकार देणार खर्च
अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी इराणवर हल्ला करत युद्ध पुकारले आणि त्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इराणने कुवैत, यूएईसह ७ देशांवर हल्ला केला आहे. या देशांमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व विमान सेवा ठप्प झाल्या आहेत. फ्लाईट रद्द झाल्याने प्रवासी विमान तळावरच अडकून राहिलेत. या परिस्थितीत अबु धाबीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाने २८ फेब्रुवारीला एक आदेश जारी करत जे प्रवासी विमान उड्डाण रद्द झाल्या कारणाने आणि अन्य कारणांमुळे अबु धाबीत अडकले आहेत. त्यांना मोफत राहण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
हॉटेलला काय दिले निर्देश?
जे पर्यटक प्रवासी या परिस्थितीत फसले आहेत त्यांच्या राहण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क लादले जाऊ नये. अतिरिक्त खोल्यांचा खर्च आमच्याकडून भागवला जाईल. जेणेकरून या प्रवाशांवर आर्थिक ओझं पडू नये. गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था केली जावी असे निर्देश मंत्रालयाकडून सर्व हॉटेल व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. विमान उड्डाणे रद्द झाल्याने जवळपास २० हजार प्रवाशांना हॉटेल आणि इतर रहिवासी क्षेत्रात थांबवण्यात आले आहे.
पत्रात काय लिहिलंय?
अबु धाबीच्या प्रशासनाने हॉटेल जनरल मॅनेजर्सच्या नावाने पत्र जारी केले आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक प्रवासी निर्बंधांमुळे हॉटेलमध्ये चेक आऊट केल्यानंतर आता देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था वाढवावी. त्याचा जो काही खर्च असेल तो आमच्याकडून दिला जाईल. पुढील काही माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. जर एखादा पर्यटक विमान रद्द झाल्याने अथवा प्रवासावर निर्बंध लादल्याने अबु धाबीत अडकला असेल तर त्याला हॉटेल रिक्त करण्याची गरज नाही. त्याला कुठलेही अतिरिक्त खर्च लावले जाणार नाहीत. सरकार स्वत: हॉटेलला खर्च देईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Wow. pic.twitter.com/fo7DSPfaXB
— Samir Arora (@Iamsamirarora) March 1, 2026
दरम्यान, हेलियोस कॅपिटलचे संस्थापक समीर अरोरा यांनी या निर्देशाची कॉपी शेअर करत यूएईने मानवतेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. जर अशी परिस्थिती अन्य कुठे उद्भवली असती तर त्याठिकाणी ५ पटीने दर वाढवण्यात आले असते असं एका युजरने म्हटलं. तर दुसऱ्याने या संकटात व्हिसा, हॉटेलमध्ये राहण्याची मुदतवाढ आणि जेवणाची व्यवस्था यूएई प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे एक उदाहरण जगाला दाखवून दिले असं म्हटलं आहे. पर्यटक प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित आणि जबाबदार देश म्हणून UAE चं कौतुक होत आहे.