एफएमसीजी (FMCG) कंपन्या लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच आली होती. त्यावर अंमलबजावणी करत दिग्गज एफएमसीजी कंपनी डाबरनं (Dabur) आपल्या बहुतांश उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. किमती वाढवण्यासोबतच कंपनीने छोट्या पॅकचा आकार आणखी लहान केलाय. इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम आता उत्पादनांच्या किमतींवर आता दिसतोय.
पश्चिम आशियातील संकटामुळे भारतात व्यवसाय करणे महाग होत चाललं आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढवणं भाग पडलंय. कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. सध्या महागाईत १० टक्क्यांची वाढ दिसत असून त्याचा परिणाम होम, पर्सनल आणि हेल्थकेअर या सर्व क्षेत्रांतील उत्पादनांवर झाला असल्याची प्रतिक्रिया डाबरचे ग्लोबल सीईओ मोहित मल्होत्रा यांनी दिली.
जीएसटी कपातीचा मिळणार लाभ
मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, उत्पादनांच्या किमती वाढल्या असल्या तरी जून तिमाहीपर्यंत जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना दिसेल, विशेषतः छोट्या पॅकवर. मात्र, कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे १० आणि २० रुपयांच्या पॅकेटच्या आकारात थोडी कपात करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी पॅकेटचा आकार वाढवला होता, तो आता पुन्हा पूर्वीच्या स्तरावर आला आहे.
कंपनीच्या नफ्यात १५ टक्क्यांची वाढ
पश्चिम आशिया संकटामुळे किमती वाढवण्याची घोषणा झाली असली, तरी मार्चला संपलेल्या तिमाहीत डाबरच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा ३६९ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षी ३२० कोटी रुपये होता. कंपनीची विक्रीही ७ टक्क्यांनी वाढून ३,०३८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
मान्सूनचा व्यवसायावर परिणाम
मान्सून आणि हवामानातील बदलांमुळे यावर्षी कंपनीच्या पेयांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विशेषतः उत्तर भारतात सातत्यानं होणाऱ्या पावसामुळे पेयांच्या विक्रीत घट झाली आहे. मात्र, जर 'अल निनो'चा प्रभाव दिसला आणि उन्हाचा कडाका वाढला, तर पेये आणि ग्लुकोज उत्पादनांच्या विक्रीत १० टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते. सध्या ही वाढ ६ टक्क्यांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात याची विक्री ३.५० टक्क्यांनी जास्त आहे.
एफएमसीजी क्षेत्रात ९ टक्क्यांहून अधिक वाढ
मल्होत्रा यांनी सांगितलं की, हवामानाचा प्रभाव असला तरी एकूणच एफएमसीजी क्षेत्रात ९.२ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. यामध्ये ग्रामीण भागात ११.४ टक्के तर शहरी भागात ८ टक्के वाढ आहे. ग्रामीण भागात पिके चांगली आल्यामुळे एफएमसीजी क्षेत्राची पुन्हा एकदा जोमानं वाढ होत आहे. पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागातील वाढीमधील फरक ५ टक्क्यांपर्यंत असायचा, मात्र यावेळी शहरी भागानेही चांगली कामगिरी केल्यामुळे हा फरक ३.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
