तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:26 IST2026-05-08T12:25:16+5:302026-05-08T12:26:18+5:30
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. याठिकाणी सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यात टीव्हीकेकडे सर्वाधिक १०८ जागा आहेत

तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
चेन्नई - तामिळनाडूत सरकार बनवण्याचा पेच कायम आहे. राज्यातील कुठल्याही पक्षाकडे बहुमत नसल्याने अद्याप सरकार बनवण्याचा मार्ग स्पष्ट झाला नाही. त्यात दक्षिण भारतातील या राज्याच्या राजकारणात अशा घटना घडत आहेत ज्याची कल्पना मागील ५० वर्षात कुणीही केली नसेल.
अभिनेता ते नेता बनलेल्या थलापती विजय याचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. परंतु बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. काँग्रेसने विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे मात्र तरीही सरकार बनवण्यासाठी लागणाऱ्या बहुमताचा मॅजिक आकडा ते पूर्ण करू शकत नाहीत. तामिळनाडूत भाजपासोबत मिळून निवडणूक लढणारी AIADMK आता एनडीएतून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यात भाजपाशी आघाडी तोडून AIADMK तामिळनाडूत टीव्हीके आणि डिएमकेमध्ये कुणाशी हातमिळवणी करणार हा प्रश्न आहे.
AIADMK भाजपापासून वेगळे होणार?
तामिळनाडू विधानसभेत AIADMK आणि भाजपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. परंतु विजय यांच्या टीव्हीके पक्षाने राज्यात घवघवीत यश मिळवले. राज्यात टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या, परंतु सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. ज्यातून त्यांचे संख्याबळ ११३ पर्यंत पोहचले आहे. विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा करत दोनदा राज्यपालांची भेट घेतली. परंतु अद्याप राज्यपालांकडून त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाले नाही. राज्यपालांनी विजय यांच्याकडे ११८ आमदारांची यादी मागवली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर सलग चौथ्यांदा निवडणूक हरलेला AIADMK पक्ष आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भाजपासोबत असल्याने AIADMK ला सोबत घेण्यास विजय तयार नाही. त्यात आता AIADMK एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाची पडद्यामागून खेळी
तामिळनाडूत विजय आणि काँग्रेस एकत्र आल्याने डीएमके नाराज आहे, तर भाजपाही खुश नाही. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपाची रणनीती आहे तर AIADMK पक्षाच्या अस्तित्वाच्या रणनीतीवर काम करत आहे. जर AIADMK यांनी एनडीएपासून वेगळे होण्याची भूमिका घेतली तर ते कुणासोबत जातील अशी चर्चा आहे. भाजपा आणि AIADMK वेगळे झाले तर विजय यांच्या टीव्हीके पक्षाला त्यांच्यासोबत सरकार बनवण्यात काही अडचण नाही कारण विजय यांनी आधीच त्यांची विचारधारा स्पष्ट केली आहे. डिएमके त्यांचा राजकीय विरोधक तर भाजपा वैचारिक विरोधक असल्याचे विजय यांनी सांगितले आहे. त्यात तामिळनाडूत काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील मैत्री भाजपाला रुचली नाही. काँग्रेसने विजयसोबत जात सरकार बनवावे असं भाजपाला वाटत नाही. त्यामुळेच DMK आणि AIADMK आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.
परंतु डिएमके प्रमुख एम. के स्टॅलिन आणि जुने नेते या प्रयोगापासून लांब राहत आहेत. या आघाडीने समर्थकांमध्ये आक्रोश निर्माण होईल अशी भीती त्यांना आहे. त्यामुळेच डिएमकेकडून विजय यांना सरकार चालवू द्यावे, त्यांना ६ महिने वेळ द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच डिएमके आणि AIADMK एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला तर आमचे सर्व १०८ आमदार सामुहिक राजीनामे देतील अशी घोषणा विजय याने केली. विजय यांच्या या खेळीने तामिळनाडूत जनता आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात असं बोलले जाते. त्यामुळे तामिळनाडूत सध्या राजकीय 'दंगल' सुरू आहे.
विधानसभेतील नंबर गेम काय?
दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. याठिकाणी सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यात टीव्हीकेकडे सर्वाधिक १०८ जागा आहेत. दुसरीकडे डिएमके आघाडीकडे ७४ जागा, ज्यात डिएमकेचे ५९ आणि इतर पक्षाचे १० आमदार आहेत. काँग्रेसचे ५ आमदार टीव्हीकेसोबत गेलेत. परंतु डिएमकेसोबत डावे, मुस्लीम लीग पाठबळ आहे. AIADMK आघाडीकडे ५३ जागा असून इतरांकडे ६ जागा आहेत. त्यामुळे विजय यांना बहुमत मिळवण्यात यश येते का हे पाहणे गरजेचे आहे.