पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 18:34 IST2025-04-27T18:34:04+5:302025-04-27T18:34:29+5:30
Bilawal Bhutto Family Left Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
Pahalgam Terror Attack Update: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्यासह पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली आहेत. तसेच, दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता, कधीही युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण असून, लोक देश सोडून पळून जात आहेत. कालच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे कुटुंब देश सोडून पळाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचे कुटुंबदेखील पाकिस्तान सोडून कॅनडाला पळाल्याची माहिती समोर आली आहे.
भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर बिलावल भुट्टोने धमकी दिली होती की, जर पाकिस्तानचे पाणी थांबवले, तर रक्ताच्या नद्या वाहतील. या धमकीच्या एका दिवसानंतर, म्हणजेच आज त्याच्या कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याची बातमी येत आहे.
अनेकजण परदेशात पळाले
भारत कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती सध्या पाकिस्तानमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्याचे मनोबलही घसरले असून, अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना परदेशात पाठवले आहे. यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर याचाही समावेश आहे. या लोकांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी जेटने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याचे वृत्त आहे.