पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 05:59 IST2026-05-14T05:58:10+5:302026-05-14T05:59:03+5:30
एसपीजीच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवून पंतप्रधानांच्या ताफ्याचे आकारमान कमी करण्यात आले आहे.

पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केलेच पण ते स्वत:ही अमलात आणले आहे. नागरिकांना इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्यास सांगितल्यावर काही दिवसातच आपल्या वाहनांच्या ताफ्यातही लक्षणीयरीत्या कपात केली. त्यानंतर भाजपशासित मुख्यमंत्री व नेत्यांनीही अशा प्रकारच्या उपाययोजना स्वीकारल्या आहेत.
अधिकृत सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या अलीकडील देशांतर्गत दौऱ्यांमध्ये त्यांच्या ताफ्याचे आकारमान कमी करण्यात आले आहे. एसपीजीच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवून ही कपात करण्यात आली आहे.
गुजरात आणि आसाममधील दौऱ्यांमध्ये मोदी यांच्या ताफ्याचा आकार कमी करण्यात आला. तसेच, नवीन खरेदी न करता शक्य त्या ठिकाणी पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
कुठे ताफ्यात कपात?
उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताफा कमी केला.
मध्य प्रदेश : मुख्यमंत्री मोहन यादव ताफ्यात कमीत कमी वाहने वापरणार.
दिल्ली : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींसाठी वाहनांच्या वापरावर मर्यादा घातल्या.
राजस्थान : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश.
आंध्र प्रदेश : मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू दोन दिवसांत जाहीर करणार उपाययोजना.
गुजरात : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा गुजरातमध्ये हेलिकॉप्टर आणि विमानांऐवजी रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा निर्णय. ताफ्याचा आकारही कमी केला.
छत्तीसगड : मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी ताफ्याचा आकार कमी केला.
मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; विदेश दौरे न करण्याचे फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षकांची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा स्वीकार केला असून ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली.