नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये विक्रमी उसळी पाहायला मिळाली.
दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर तब्बल ८,५५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,६५,३५० रुपयांवर पोहोचला. यापूर्वी हा दर १,५६,८०० रुपये होता.
चांदीच्या दरातही मोठी झेप घेत प्रति किलो २०,५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव २,७७,००० रुपयांवरून २,९७,५०० रुपये प्रति किलोवर गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी सोन्याच्या खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
का वाढवले शुल्क?
पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक आयात कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर प्लॅटिनमवरील आयात शुल्कही ६.४ वरून १५.४ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.
सोने-चांदीचे डोरे, नाणी आणि इतर संबंधित वस्तूंवरील शुल्कातही बदल करण्यात आले असून नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत.
याचा परिणाम काय?
व्यापाऱ्यांच्या मते, वाढीव शुल्काचा प्रत्यक्ष परिणाम काही दिवसांत खरेदीवर दिसून येईल.
सोन्याच्या किमती वाढतील आणि मागणी मंदावू शकते. जागतिक अनिश्चितता आणि रुपयावरील दबावाच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून आकर्षक राहील.
दरवाढीला आधार
रुपयाच्या घसरणीमुळेही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याचे विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.८० या नीचांकी पातळीवर घसरला आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती व परकीय चलन बाहेर जाण्याच्या भीतीमुळे दबाव वाढला आहे. शुल्क वाढवून आयात थांबत नाही; उलट किमती आणखी वाढतात. यावर प्रमाणात्मक निर्बंध प्रभावी ठरतील, असे जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने म्हटले.
