"अमेरिकेनं आपल्याला टॉयलेट पेपरसारखं वापरलं अन् फेकून दिलं"; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री भरसंसदेत काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 03:38 IST2026-02-11T03:37:14+5:302026-02-11T03:38:14+5:30
ख्वाजा आसिफ म्हणाले, अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानने इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केले नाही. उलट, अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना 'जिहाद'च्या नावाखाली मरण्याच्या दारात ढकलले. यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही.

"अमेरिकेनं आपल्याला टॉयलेट पेपरसारखं वापरलं अन् फेकून दिलं"; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री भरसंसदेत काय बोलले?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये तालिबानचा उल्लेख करत अमेरिकेवर थेट निशाणा साधला. ख्वाजा आसिफ म्हणाले, अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानने इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केले नाही. उलट, अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना 'जिहाद'च्या नावाखाली मरण्याच्या दारात ढकलले. यातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही.
अमेरिकेनं टॉयलेट पेपरप्रमाणे वापरलं आणि फेकून दिलं -
ख्वाजा आसिफ म्हणाले, या युद्धांचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल केले, ज्यांत आजही सुधारणा झालेली नाही. १९९९ नंतर केवळ अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी, पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धात सामील झाला. त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागली. या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर निशाणा साधताना आसिफ म्हणाले, "पाकिस्तानचा वापर टॉयलेट पेपरप्रमाणे केला आणि काम झाल्यानंतर फेकून दिले."
'ती' एक मोठी चूक होती -
आसिफ पुढे म्हणाले, "या चुकीच्या निर्णयांनी पाकिस्तानला इतरांच्या युद्धातील 'मोहरा' बनवले. १९८० च्या दशकात अमेरिकेने रशियाविरुद्धअफगाणिस्तानात बंड घडवून आणले होते. त्या वेळी, पाकिस्तान सरकारला अमेरिकन 'कुबड्यांचा' आधार हवा होता. यामुळे, आपण आपल्या लोकांना या युद्धात लोटले, ती एक मोठी चूक होती."
याची भरपाई कधीही होऊ शकत नाही -
तालिबानने रशियाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला 'जिहाद' नाव दिले. मात्र तो जिहाद नव्हता, कारण रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केलेला नव्हता, असेही आसिफ यांनी स्पष्ट केले. "२००१ मध्येही आपण अमेरिकेसाठी तालिबानच्या विरोधात गेलो. अमेरिका तर निघून गेली, पण आपण आजही याचे चटके भोगतोय. याची भरपाई कधीही होऊ शकत नाही," असेही आसिफ यावेळी म्हणाले.