सततच्या त्रासाला कंटाळून दारुड्या मुलाला संपवलं; आई आणि भावानेच खून केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:17 IST2026-05-14T13:16:19+5:302026-05-14T13:17:37+5:30
खुनानंतर रचलेला 'अपघाताचा' बनाव डॉक्टरांच्या एका अहवालाने उघड.

सततच्या त्रासाला कंटाळून दारुड्या मुलाला संपवलं; आई आणि भावानेच खून केल्याचे उघड
वसमत (जि. हिंगोली): शहरातील जयनगर भागात प्रवीण रामराव गाडेकर (वय ३८) या तरुणाची त्याच्याच कुटुंबाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून आणि प्रवीणच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आई सिताबाई आणि भाऊ माधव गाडेकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमकी घटना काय?
मयत प्रवीण हा दारू पिऊन घरात नेहमी धिंगाणा घालत असे. ११ मे रोजी दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास प्रवीण पुन्हा गोंधळ घालत असताना, त्याचा मोठा भाऊ माधव (वय ४६, रा. पुणे) आणि आई सिताबाई (वय ६६) यांनी त्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
प्रवीणचा मृत्यू झाल्यानंतर आई व भावाने बनाव रचला की, "प्रवीणचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि त्यातच तो मेला". सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात प्रवीणचा मृत्यू पायऱ्यांवरून पडल्याने नाही, तर जड वस्तूच्या मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
सत्य आले बाहेर
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संशयित आई आणि भावाची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. सततच्या त्रासाला कंटाळून हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.