शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती व विकास अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:01+5:30
ज्या शेतकऱ्याकडे थोडीशी जमीन आहे तो सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याचा विचार करतो. आमच्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. जोपर्यंत आदिवासी समाज शिक्षीत आणि संघटीत होणार नाही. तोपर्यंत समाजाचा सर्वांगिन विकास शक्य नाही. असे प्रतिपादन आ.सहषराम कोरोटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी हलबा हलबी समाजाच्या अधिवेशनात मोठ्या संख्येने शिक्षित व नोकरी करणारे व्यक्ती दिसून येत आहेत. मात्र वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे. मागे वळून पाहिले तर चिलमटोलासारख्या गावात राहणाऱ्या आदिवासी समाजाचा विचार करावा लागेल. आज सुद्धा मेहनती आदिवासी समाजाची स्थिती दयनीय आहे. ज्या शेतकऱ्याकडे थोडीशी जमीन आहे तो सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याचा विचार करतो. आमच्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. जोपर्यंत आदिवासी समाज शिक्षीत आणि संघटीत होणार नाही. तोपर्यंत समाजाचा सर्वांगिन विकास शक्य नाही. असे प्रतिपादन आ.सहषराम कोरोटे यांनी केले.
आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महाराष्ट्र राज्य शाखा गोंदियाद्वारे स्थानिक द्वारका लॉन येथे रविवारी (दि.१२) प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजित करण्यात आले होते.
या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष फरेंद्र कुथिरकर होते. उद्घाटन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी नामदेवराव वडगाये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र मरस्कोल्हे,मधुकर उईके, राजकुमार नाईक, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, सदाशिव कुरसुंगे, श्यालीकराम मानकर, यशवंत मालये, मिलिंद फुलसुंगे, राहुल वडगाये, डॉ.दिलीप लटये, आयोजक चंदा चौधरी व प्रेमलाल कोरोडे उपस्थित होते. आमदार कोरोटे म्हणाले, जेव्हा समाज शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवून नोकरी करू लागला आहे. तर काही षडयंत्रकारी लोकांची नजर एससी, एसटी व बहुजन समाजाच्या आरक्षणावर लागली आहे. एक ना एक दिवस आरक्षण कमी होईल.
आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आमची तयारी काय आहे. समोर जाण्यासाठी आपल्या तयारीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. समाज हलबा, हलबी, कोष्टी यामध्ये फसला असून त्यांनी विधानसभा व लोकसभेच्या माध्यमातून न्याय देण्याचे आश्वासन हलबा हलबी समाजाला दिले.या वेळी समाजातील इतर मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, एमबीबीएस व आयआयटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा सत्कार करण्यात आला. यात हेमराज राऊत, बी.के.गावराने, चंदा चौधरी, राजेश कोल्हारे, राजकुमार नाईक, राजकुमार हिवारे, राजेंद्र मरस्कोल्हे, नामदेव वडगाये, सदाशिव कुरसुंगे, एस.राजेश राऊत, अनुप बोरधरे, जान्वी लटये, ललिता नाईक, जान्वी खांडगाये, पुजा मासरकर, पवन मडावी, रूपेश गावडकर, स्मिता खांडवाये, अतुल राऊत, अजय चौधरी आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संचालन पद्माकर मानकर यांनी केले.