विद्यार्थ्यांनो कौशल्य विकायला शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:19+5:30
अनेकांच्या आयुष्यात पुस्तकाने क्रांती केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची उदाहरण आहेत. प्रत्येकात सामर्थ्य आहे. त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. परिश्रम केल्यानेच यश मिळते. माणूस हा बुद्धिमान आहे. बुद्धीला ताण द्या. उद्भवलेल्या अडचणी व निर्माण झालेले प्रश्न सोडवायला शिका. नवीन कल्पना मनात येऊ द्या. त्यांना रजिस्टर्ड करा. तुमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कोणत्याही मोफत मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते. पूर्वी उदारमतवादी महाराष्ट्र होतं. जागतिकीकरण आपण स्वीकारलं. जागतिकीकरणात प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते, तरच तिचे महत्त्व पटते हे सिध्द झालं आहे. यासाठी कौशल्य विकायला शिका. कौशल्य हे शिक्षण व ज्ञानाने प्राप्त होते असे प्रतिपादन कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक जि.प.माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोंदिया जि.प.चे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले हे होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य राजेश भक्तवर्ती, गिरीश पालिवाल, अर्जुन नागपुरे, मंजुषा चांदेवार, देवेंद्र रहिले, डी.के.मस्के, हेमराज नाकाडे, शंकर लोधी, लालबहादूर चंदेल, सिद्धार्थ टेंभूर्णे, एस.टी.रेहपाडे, पी.टी.बन्सोड, प्राचार्य डी. डब्ल्यू.दिवठे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.एल.नंदागवळी उपस्थित होते.
नरेंद्र आरेकर म्हणाले, संस्कृती बदलत चालली आहे. माणूस संकुचित होत आहे. संकुचितपणाची देण १९९० नंतरच्या जागतिकीकरणाने दिली. आपण बदलत चाललो तरी मुलांवर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. संस्कार जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे. ज्ञान हे क्षेत्र पवित्र आहे. नाव, संपत्ती ही ज्ञानाने प्राप्त होते. नाव जन्माने मिळते मात्र मान हा कर्माने मिळते. ज्ञान हे असे एकमेव क्षेत्र आहे की त्यामुळे प्रत्येकाला विद्वान होता येते. येथे रंग, रूप आडवं येत नाही. आजपर्यंत सारेच युग स्पर्धेचे राहिले आहेत. परिस्थिती अशी आहे म्हणून रडण्यापेक्षा परिस्थिती विरुद्ध लढायला शिका. आयुष्यात यश, अपयश येतातच.
अनेकांच्या आयुष्यात पुस्तकाने क्रांती केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची उदाहरण आहेत. प्रत्येकात सामर्थ्य आहे. त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. परिश्रम केल्यानेच यश मिळते. माणूस हा बुद्धिमान आहे. बुद्धीला ताण द्या. उद्भवलेल्या अडचणी व निर्माण झालेले प्रश्न सोडवायला शिका. नवीन कल्पना मनात येऊ द्या. त्यांना रजिस्टर्ड करा. तुमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश केला.
या वेळी गिरीश पालिवाल, अरविंद शिवणकर, विश्वजीत डोंगरे, हमीद अल्ताफ अकबर अली व रमेश अंबुले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डी.डब्ल्यू.दिवठे यांनी मांडले.
स्नेहसंमेलनाचे संचालन आर. डी. करचाल व व्ही. एस. इरले यांनी केले तर उपस्थितांचे आभार एल.व्ही.मुंगूलमारे यांनी मानले.
ध्वजारोहणाचा मान विद्यार्थिनीला
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण जि.प.सदस्य गिरीश पालिवाल यांचे हस्ते होते. हा पायंडा मोडत त्यांनी विद्यालयातून दहावीत प्रथम येणारा परंतु इयत्ता अकरावीत याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देण्याचे जाहीर केले आहे. तर स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण हा विद्यालयातून बारावीत प्रथम येणाºया विद्यार्थ्याच्या करण्यात येणार आहे. यावर्षीच्या ध्वजारोहणाचा मान हर्षिता हरीश पचारे या विद्यार्थिनीला मिळणार आहे. गिरीश पालिवाल यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.