सुरक्षेच्या दृष्टीने अर्धा तास केंद्रावरच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:20+5:302021-06-22T04:20:20+5:30

गोंदिया : काही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे एवढीच काळजी घेण्याची गरज आहे. ...

Stay at the center for half an hour for safety | सुरक्षेच्या दृष्टीने अर्धा तास केंद्रावरच थांबा

सुरक्षेच्या दृष्टीने अर्धा तास केंद्रावरच थांबा

गोंदिया : काही गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे एवढीच काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्वांसाठी कोरोनाची लस सुरक्षित आहे व तसे आतापर्यंतच्या अभ्यासातून निष्पन्नही झाले आहे. मात्र काही व्यक्तींना लसीची ॲलर्जी असते किंवा काही व्यक्तींना लस घेतल्याने रिॲक्शन होते असे प्रकार घडतात. यात कोरोना लसीमुळेच त्यांच्यासोबत असे होणे शक्य नसून अन्य औषध किंवा लसींमुळेही तसे होते. यामुळेच नागरिकांना लस घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रातच अर्धा तास थांबून राहण्यास सांगितले जाते. यासाठी केंद्रात बसण्याची व बेडचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र काही व्यक्ती आम्हाला काहीच होत नाही असा आव आणून लस घेतल्यानंतर लगेच निघून जातात. मात्र कित्येकदा काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर भोवळ येणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर खाज, श्वास घेण्यास त्रास होणे असे रिॲक्शन होतात. जास्तच झाल्यास व्यक्ती बेशुद्धही पडू शकते. अशात त्या व्यक्तीला लगेच दुसरे औषध किंवा लस द्यावी लागते. केंद्रातून बाहेर पडल्यावर असले प्रकार घडून संबंधितांची धावपळ होऊ नये किंवा काही धोका होऊ नये यासाठीच केंद्रात अर्धा तास बसणे गरजेचे आहे.

--------------------------------------

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३,५०,६५२

पहिला डोस- २,६७,९४६

दुसरा डोस- ८२,७०६

एकूण लसीकरण केंद्र- १९०

३०-६० वयोगटासाठी केंद्र- १९०

------------------------------

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी ?

कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे आतापर्यंत कुणालाही काही त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. तरीही काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, अंगावर खाज, मळमळ, भोवळ येणे यासारखे रिॲक्शन होतात. मात्र काही वेळापुरतेच असतात. एखाद्या व्यक्तीला काही जुना त्रास असल्यास किंवा लसींची रिॲक्शन असल्यास ते बेशुध्द होऊ शकतात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशात त्या व्यक्तीला लगेच दुसरे औषध किंवा लस द्यावी लागते. आता लस घेऊन बाहेर गेल्यावर असे काही घडल्यास धोका होण्याची शक्यता असते. म्हणूनच लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबणे अधिक गरजेचे आहे.

- डॉ. नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी

-----------------------------------

लस हेच आहे औषध

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांच्या संपूर्ण चाचण्या करूनच वापराला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, भोवळ व अंगदुखी तसेच ताप येण्यासारखे त्रास होतात. मात्र हे काही वेळापुरतेच राहत असून यापासून घाबरण्याची गरज नाही. साधी तापाची गोळी घेऊनही व्यक्ती बरा होतो. कारण कोरोनाशी लढण्यासाठी असलेली ही लस या सर्व तक्रारींवरही औषधाचे काम करते.

-------------------------------------

कोरोनावर लगाम लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींची परिणामकारकता दुसऱ्या लाटेत दिसून आली आहे. त्यामुळे आता कोरोनाला पुढे नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी. कोरोनाची ही लस अत्यंत सुरक्षित असून, कुणीही आपल्या मनात भीती व भ्रम न बाळगता लस घ्यावी. हे तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबीयांसाठी गरजेचे आहे.

- डॉ. अमरीश मोहबे

जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Stay at the center for half an hour for safety