राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:00 IST2026-04-17T06:59:38+5:302026-04-17T07:00:08+5:30
Heat Wave In Maharashtra: राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
मुंबई - राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस घ्यावे, सैल कपडे वापरावेत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व मुलांची काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत.
पावसाची हलकी सर, उष्णतेचीही बसणार झळ
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या
ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
१६ ते १८ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.
साताऱ्यात माणमध्ये उष्माघाताचा बळी?
सातारा शहरातील तापमानाची गुरुवारी ४१.२ अंशाची नोंद झाली असून, माण तालुक्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याचे सांगण्यात येते. हणुमंत काशीनाथ चव्हाण शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. त्यावेळी थकवा जाणवल्याने झाडाखाली बसले. पण, चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.