दोन महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:32+5:30
यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामान खात्याने गुरूवारपासून जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. गुरूवारी (दि.६) पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव तालुक्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली होती. गेल्या २४ तासात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्याला सुरूवात होवून सात दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली आहे. तर पºहे सुध्दा वाळत असल्याचे चित्र काही भागात आहे. धानाची रोवणी करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो.
मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे खरिपातील धान पिकांवर अद्यापही संकट कायम आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकड अर्जुनी तालुक्यातील सौदंड महसूल मंडळात ६५.२० मिमी आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात ७० मिमी पाऊस झाल्याने या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरूवारी सुध्दा सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या भागातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
यंदा आॅगस्ट महिन्याला सुरूवात झाली तरी रोवणीची कामे आटोपलेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील ५० टक्के रोवणी शिल्लक आहे. पावसाला विलंब होत असल्याने रोवणीचा अनुकुल कालावधी निघून जात आहे.त्यामुळे रोवणीच्या कामाला विलंब होत असल्याने याचा धानाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासात पडलेला पाऊस
जिल्ह्यात मागील २४ तासात आठही तालुक्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया ७ मिमी, गोरेगाव २.८० मिमी, तिरोडा ६७.४० मिमी, अर्जुनी मोरगाव २२.२० मिमी, देवरी ६४ मिमी, आमगाव ८.८० मिमी, सालेकसा ६.८० मिमी, सडक अर्जुनी १४३.२० मिमी अशा एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.