आदिवासी आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:17+5:30
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हाभरात शासकीय आणि खासगी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात सर्वाधिक आश्रमशाळा गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येतात. त्यातील २४ शासकीय आश्रमशाळा आणि १८ खासगी आश्रमशाळांपैकी एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने सुरू नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांसह जिल्ह्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीला बगल देऊन जुन्या पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीपटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना त्याची आदिवासी विकास विभागाने दखल घेतलेली नाही.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हाभरात शासकीय आणि खासगी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात सर्वाधिक आश्रमशाळा गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येतात. त्यातील २४ शासकीय आश्रमशाळा आणि १८ खासगी आश्रमशाळांपैकी एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने सुरू नाही. केवळ शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक मशिनवर घेतली जात असल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थी आणि शिक्षक नियमितपणे शाळेत असतात किंवा नाही याची योग्य पद्धतीने नोंद व्हावी यासाठी २०११ मध्ये सर्व आश्रमशाळांना प्रत्येकी २ बायोमेट्रिक मशिन पुरविण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक मशिन विद्यार्थ्यांसाठी तर एक शिक्षकांसाठी होती. शिक्षकांसाठी असलेल्या मशिन अजूनही चालू आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मशिन केव्हाच बंद पडलेल्या आहेत. त्या बंद पडलेल्या मशिन दुरूस्त करण्याकडे किंवा दुसºया मशिन देण्याकडे अद्याप लक्ष घालण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांमध्ये बºयापैकी भौतिक सुविधा आहेत. त्यावर दरवर्षी मोठा निधी खर्च होतो. मग विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याकडेच दुर्लक्ष का होत आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
अशा आहेत तांत्रिक अडचणी
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या बायोमेट्रिक मशिन मुख्य कार्यालयाकडून पुरविण्यात आल्या होत्या त्यावर बोट्या ठस्याने हजेरीची नोंद घेतली जात होती. मात्र वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे त्या मशिनवर स्वीकारताना अनेक वेळा प्रयत्न करावे लागत होते. एकच मशिन असल्यामुळे त्यात बराच वेळ जात होता. त्यामुळे शेवटी त्या मशिन बंद पडून अडगळीत टाकण्यात आल्या. आता जुन्याच पद्धतीने मुलांची हजेरी घेतली जात आहे. वास्तविक बोटांच्या ठस्यांची समस्या असेल तर प्रत्येकाला बारकोड असणारे ओळखपत्र देऊन त्यावरूनही हजेरी घेता येऊ शकते. मात्र त्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.
वसतिगृहांमध्ये सुरळीत कार्यरत
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या मशिन बंद पडल्या असल्या तरी गडचिरोली प्रकल्प कार्यालयातील २१ शासकीय वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक मशिन कार्यरत असून त्यानुसारच विद्यार्थ्यांच्या जेवणाची बिले काढली जात आहे. त्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकने होऊ शकते तर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची का नाही? यावर सदर विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.