क्वारंटाईन सेंटर नव्हे हे तर यातना सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:54+5:30
नगर परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील न.प.च्या चार शाळांमध्ये बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना राहण्यासाठी शाळेच्या खोल्या, झोपण्याकरिता गादी, नास्ता व जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाहेरील जिल्हा आणि राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी या नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल येथे नगर परिषदेतर्फे क्वारंटाईन सेंटर स्थापन करण्यात आले. मात्र या सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणून सोडले जाते. सेंटरमध्ये किमान चांगल्या गाद्या, बेड, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आदी प्राथमिक गोष्टींची सोय असणे गरजेचे आहे. मात्र या क्वारंटाईन सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता विदारक वास्तव पुढे आले. येथील सोयी सुविधांचा अभाव पाहून हे क्वारंटाईन सेंटर आहे की यातना सेंटर हे कळायला मार्ग नव्हता.
नगर परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार शहरातील न.प.च्या चार शाळांमध्ये बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना राहण्यासाठी शाळेच्या खोल्या, झोपण्याकरिता गादी, नास्ता व जेवणाची सोय उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. विशेष म्हणजे क्वारंटाईन कक्षात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून निधी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र मनोहर म्युन्सिपल हायस्कूल येथील क्वारंटाईन कक्षाला भेट देऊन तेथील सोयी सुविधा पाहून धक्काच बसला.
ज्या खोल्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी साफसफाईचा पूर्णपणे अभाव आहे, बेड उपलब्ध करुन देणे शक्य नसले तरी किमान खाली टाकण्यासाठी संतरजी आणि गाद्या तरी चांगल्या देण्याची गरज आहे. मात्र ज्या गाद्या या सेंटरमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहे त्यांची स्थिती पाहता नागरिक त्यावर झोपण्याऐवजी खाली चादर टाकून झोपणे पसंद करतील ऐवढ्या त्या खराब आहेत. पंखे किती सुरु आहेत आणि किती बंद याची सुध्दा कल्पना न केलेली बरी. शनिवारी (दि.२३) येथील केंद्रात पुण्याहून आलेल्या दोन जणांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले. मात्र त्यांना या कक्षात आणून सोडून देण्यात आले.
जसे मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवले जाते तशीच स्थिती या क्वारंटाईन सेंटरमधील दोन नागरिकांची झाली होती. ते बिचारे आपली व्यथा सुध्दा मांडू शकत नाही. झोपण्यासाठी दिलेल्या गाद्या त्यावर झोपण्या योग्य नसल्याने या दोन जणांनी टेबलावर चादर टाकूनच कशी बशी रात्र काढल्याचे त्यांनी सांगितले. क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणाºया नागरिकांना फाईव्ह स्टॉर सुविधा नको आहेत, पण किमान ज्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे त्या तरी चांगल्या द्या अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. क्वारंटाईन सेंटरमधील वातावरण प्रसन्न असण्याऐवजी उलट ते आजारी पडण्यासारखे आहे. त्यामुळे हे क्वारंटाईन सेंटर आहे की यातना सेंटर हे कळण्यास मार्ग नाही.
जेवण्याच्या वेळी नास्ता
क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना जेवण आणि नास्त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही नगर परिषदेकडे सोपविण्यात आली आहे. मात्र सकाळी ९.३० तरी कधी १०.३० ला नास्ता दिला जातो. तर याची वेळ सुध्दा निश्चित नसल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे जेवणाच्या वेळी नास्ता दिला जात असेल तर जेवण कोणत्या वेळी दिले जात असेल याची कल्पना न केलेलीच बरी.
निधी उपलब्ध तर खर्चास कात्री का
क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मग त्यातून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची नेमकी अडचण काय आहे. साधे सॅनिटायझर आणि हॅन्डवॉश सुध्दा येथे उपलब्ध नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
शौचालय, प्रसाधनगृहाची अवस्था बिकट
येथील मनोहर म्युन्सिपल हायस्कूल येथील क्वारंटाईन केंद्रावरील शौचालय आणि प्रसाधनगृृहाची अवस्था पाहिल्यास पुन्हा कोणी तिथे जाण्याची हिम्मत करणार नाही. या शौचालय आणि प्रसाधनगृहाची नियमित साफसफाई केली जाते की नाही यावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
यामुळेच क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास नकार
बाहेरील जिल्हा आणि राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. मात्र त्या ठिकाणी किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र यापासून दूर पळण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळेच अनेक बाहेरुन आलेले नागरिक क्वारंटाईन कक्षात राहयला तयार होत नाही. ते आपली सुविधा स्वत:च करुन घेतात.