अरुंद पादचारी पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:29+5:30
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरून दररोज दीडशेवर गाड्या ये-जा करतात. तर २० हजाराहून अधिक प्रवाशी या रेल्वे स्थानकावरुन विविध ठिकाणी जातात. गोंदिया रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्थानकाला अ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. त्या दृष्टीकोनातून रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वेचा पादचारी पूल कोसळून चार ते पाच प्रवाशांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना मुंबई येथे सात ते आठ महिन्यापूर्वी घडली. या घटनेपासून रेल्वे विभागाने काही तरी धडा घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाच वरील अरुंद पाचदारी पुलामुळे चेंगराचेंगरी आणि पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरून दररोज दीडशेवर गाड्या ये-जा करतात. तर २० हजाराहून अधिक प्रवाशी या रेल्वे स्थानकावरुन विविध ठिकाणी जातात. गोंदिया रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्थानकाला अ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. त्या दृष्टीकोनातून रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या.मात्र या सुविधा उपलब्ध करुन देत असताना रेल्वे प्रशासनाने यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होणार नाही, याचा विचार केला नाही. त्यामुळेच नवीनच समस्या निर्माण झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर पादचारी पूल तयार करण्यात आले.
या फलाटावर विदर्भ एक्सप्रेस,महाराष्ट्र एक्सप्रेससह बालाघाटकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबतात. या गाड्यांमधून येणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे.त्यामुळे या फलाटावर जेव्हा गाडी येते तेव्हा प्रवाशांची मोठी गर्दी होते. तर फलाटावरुन बाहेर पडण्यासाठी पादचारी उड्डाणपूल हाच एकमेव मार्ग आहे.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने पादचारी पुलाची रुंदी वाढविण्याची गरज होती.मात्र तसे न केल्याने आणि अरुंद पुलाचे बांधकाम केल्याने पुलावर अनेकदा प्रवाशांची गर्दी आणि कोंडी होते.त्यामुळे एखाद्या वेळेस प्रवाशांचा गोंधळ होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर प्रवाशांच्या पादचारी पुलावरील गर्दीमुळे हा पूल सुध्दा कोसळून मुंबईच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही जागृत प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासन आणि रेल्वे ग्राहक संरक्षण कमिटांच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी सुध्दा याकडे गांर्भियाने न पाहिल्याने अरुंद पादचारी पुलाची समस्या कायम आहे.त्यामुळे रेल्वे विभागाला प्रवाशांच्या सुरक्षेची कितपत काळजी आहे हे सुध्दा दिसून येते.
महाव्यवस्थापकांचा कानाडोळा
गोंदिया येथील काही जागृत नागरिकांनी रेल्वे स्थानकावरील अरुंद पादचारी पुलामुळे भविष्यात होणाºया धोक्याची कल्पना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या महाव्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिली. तसेच निवेदन सुध्दा दिले. हा पादचारी पूल तयार झाल्यानंतर त्यांनी तीन ते चार वेळा या रेल्वे स्थानकाला भेट सुध्दा दिली. पण त्यांनी अरुंद पादचारी पुलाची साधी दखल सुध्दा घेतली नाही.
अपघात झाल्यानंतरच जाग येणार का ?
फलाट क्रमांक पाच वरील अरुंद पादचारी पुलाची समस्या अनेकदा रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी मांडून पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही रेल्वे विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे या पुलावर अपघात झाल्यानंतरच रेल्वे विभागाला जाग येणार का असा सवाल रेल्वे प्रवाशांनी केला आहे.
मेटल डिटेक्टर तपासणी यंत्र नावापुरतेच
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मेटल डिटेक्टर तपासणी यंत्र लावण्यात आले आहे. मात्र हे यंत्र महिन्यातून अनेकदा बंद असते. मागील महिन्यात केवळ हे यंत्र नियमितपणे सुरू होते.त्यानंतर पुन्हा हे यंत्र बंद पडले असून सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
पुन्हा जैसे थे स्थिती
गोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलाने घेतला होता. यासाठी मागील महिन्यात रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामुळे रेल्वे स्थानकावरील असामाजिक तत्वांचा वावर कमी झाला होता. मात्र मागील दहा बारा दिवसांपासून पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.