३५५ गोंदियावासीय म्हणतात ‘तेरे गलीयो में ना रखेंगे कदम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:05+5:302021-05-17T04:28:05+5:30

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढला, दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रूग्णालयात मृतदेहांचे ढिगारे पडू लागले, परंतु गोंदियावासी ...

355 Gondia residents say ‘Tere galio mein na rakhenge kadam’ | ३५५ गोंदियावासीय म्हणतात ‘तेरे गलीयो में ना रखेंगे कदम’

३५५ गोंदियावासीय म्हणतात ‘तेरे गलीयो में ना रखेंगे कदम’

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढला, दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रूग्णालयात मृतदेहांचे ढिगारे पडू लागले, परंतु गोंदियावासी घरात न राहता सरळ रस्त्यावरच येत असत. या रस्त्यावर येणाऱ्यांना गोंदिया शहर पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. १ एप्रिल ते १३ मे या ४३ दिवसात गोंदिया शहर पोलिसांनी तब्बल ६५ गुन्हे दाखल करून या ६५ गुन्ह्यात ३५५ लोकांना आरोपी केले. त्यामुळे आता गोंदियावासी धास्तावलेले आहेत. आता त्यांच्या मुखातून हिंदी चित्रपट हवस मधील गाणे ‘तेरे गलीयो मे ना रखेंगे कदम, आज के बाद...! हेच निघत आहे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे दुसऱ्या लाटेत ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला. एप्रिल महिन्यात मृतदेहांचे ढिगारेही रूग्णालयात अनुभवायला मिळाले. महाराष्ट्र सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी केली तरीही गोंदियावासीय या संचारबंदीचे उल्लंघन करीत होते. कोरोना रूप दिवसेंदिवस विक्राळ होत होते. आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणा रात्रंदिवस काम करूनही कोरोनाचा संसर्ग सुरूच होता. कोरोना रूग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. याला कारणीभूत असलेले घराबाहेर पडणारे लोक रूग्णांची संख्या वाढवितच होते. अशातच पोलिस यंत्रणा एक्शन मोडमध्ये न आल्यास परिस्थिती अत्यंत बिकट झाली असती. प्रशासकीय यंत्रणा कोलमडली असती, अशातच गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी आपापल्या पोलीस ठाण्यांतर्गत कडक बंदोबस्त करून बाहेर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू केला. विनाकारण घराबाहेर पडल्यास खैर नाही अशी ताकीदच पोलिसांनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी सर्वात जास्त आणि कडक कारवाई केली ती गोंदिया शहर पोलिसांनी. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेधडक कारवाई करण्यास सुरूवात केली. १ एप्रिलपासून १३ मे या काळात गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्यांवर ६५ गुन्हे दाखल केले. त्या ६५ गुन्ह्यात ३५५ आरोपींचा समावेश आहे. भादंविच्या कलम १८८, २६९, २७० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. गोंदिया शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धसका घेत गोंदिया शहराच्या गल्लोगल्ली व रस्त्यावर विनाकारण फिरणारे कारवाईमुळे धास्तावलेले असून ‘तेरे गलीयो मे ना रखेंगे कदम, आजके बाद’ असेच म्हणत असतील.

बॉक्स

दुकानदारही आले सीस्टममध्ये

पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यावर गोंदियातील व्यापारी आपले नुकसान होऊ नये म्हणून दुकान उघडण्यासाठी खूप घाई करीत होते. त्यासाठी ते शासन व प्रशासनावर आखडपाखड करीत होते. दुसऱ्या वेळी संचारबंदी घोषीत झाल्यानंतर आठ दिवसातच व्यापारी आपापले दुकान उघडण्यासाठी एकत्र येऊन आंदाेलन करण्याच्या तयारीत होते. परंतु गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी व्यापाऱ्यांशी साधलेला संवाद व नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा भरलेला दम आणि कोरोनाच्या संसर्गामुळे होणारी मृत्यूसंख्या पाहून व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवली. अत्यावश्यक दुकानांना मूभा दिली पण त्यांच्यासाठीही वेळ ठरविण्यात आला. वेळेचे भान न ठेवता दुकान चालकविणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले.

कोट

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन सर्वांनी करायला हवे. आपल्या बरोबर दुसऱ्याचेही जीव धोक्यात घालू नका असे वारंवार आवाहन करून काही लोक ऐकत नव्हते. त्यांच्यावर बेधडक कारवाई करणे सुरू केल्याने कामाशिवाय आता कुणीही बाहेर पडतांना दिसत नाही.

- महेश बन्साेडे, पोलीस निरीक्षक गोंदिया शहर

Web Title: 355 Gondia residents say ‘Tere galio mein na rakhenge kadam’