नवी दिल्ली - माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल याने भारताच्या क्रिकेट संरचनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ‘एनसीएच्या आत गेलात, तर ते ठिकाण हॉस्पिटलसारखे वाटते. खेळाडू तेथे जायला घाबरतात,’ असे खळबळजनक विधान त्याने केले.
मुनाफ म्हणाला, ‘तुम्ही एनसीएच्या आत गेलात तर सगळे समजेल. मी खूप आधीपासून सांगतोय. यात बदल होणे शंभर टक्के गरजेचे आहे. क्रिकेटपटू जायला घाबरतात. ते ठिकाण हॉस्पिटलप्रमाणेच वाटते.’ एका मुलाखतीत मुनाफ पुढे म्हणाला की, ‘सध्याच्या व्यवस्थेत खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया जाणवत नाही. दर्जेदार क्रिकेटपटू सातत्याने तयार व्हायचे असतील तर राज्य पातळीवर पायाभूत सुविधा, जसे फिजिओथेरपिस्ट, ट्रेनर आणि प्रशिक्षकांची फळी मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे.’
बदल होण्याची आशा आहे!
‘एनसीए’वर सडकून टीका करताना त्याने म्हटले की, ‘सध्या ही संस्था सर्वांगीण खेळाडू विकासाऐवजी, केवळ पुनर्वसनावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे. २००० च्या दशकात राजसिंग डुंगरपूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या धर्तीवर ‘एनसीए’ची स्थापना केली.
ऑस्ट्रेलियाने आपले मॅन्युअल अनेक वेळा अपडेट केले; पण आपण अजूनही २००० सालातील तेच २५ वर्षे जुने मॅन्युअल वापरत आहोत. त्यात फारसा बदल झालेला नाही. नवीन सेंटर ऑफ एक्सलन्समुळे कदाचित काही बदल होतील, अशी आशा आहे; पण आतापर्यंत तसे काही झालेले नाही.’
कौशल्यही सुधरावे
आपला मुद्दा पटवून देत मुनाफ म्हणाला, ‘जेव्हा मला दुखापत होते, तेव्हा मी एनसीएत का जातो? फिट होण्यासाठी. ते एकप्रकारे हॉस्पिटलसारखे झाले आहे. तुम्ही बरे होता, परत येता आणि थेट संघात जाता. पण, तुमच्या चुका कोण सुधारतो? मी गोलंदाज असो किंवा फलंदाज, केवळ तंदुरूस्ती पुरेशी नाही, माझ्या कौशल्यातही सुधारणा होणे गरजेचे आहे.’
‘गंभीर बेधडक कठोर निर्णय घेतो’
मुनाफ पटेल याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पाठराखण केली. तो म्हणाला, ‘गंभीर खरं आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळेच, त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. परंतु, ते देशासाठी कठोर निर्णय घेण्यास घाबरत नाहीत. कठोर निर्णय घेताना गंभीर यांनी अनेकांशी पंगा घेतला, हे सर्वश्रुत आहे.’