वाळपईत अवकाळी पाऊस; सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट, घरावर कोसळले झाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:38 IST2026-05-08T12:38:22+5:302026-05-08T12:38:40+5:30
चोर्लाघाटात पडझडीमुळे वाहतूक खोळंबली

वाळपईत अवकाळी पाऊस; सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट, घरावर कोसळले झाड
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वाळपई नगरगाव परिसरासह सत्तरी तालुक्यातील काही ग्रामीण भागात गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सोसाट्याचा वारा-पावसाबरोबरच जोरदार विजांचा गडगडाटाही झाला. या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
चोर्ला घाटामध्ये वाऱ्यामुळे रस्त्यावरच झाडे उन्मुळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूकही खोळंबून राहिली. मात्र पडझडीची माहिती मिळतात वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतील. रस्त्यावर पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
तसेच ठाणे पंचायत क्षेत्रामधील हिवरे येथे घरावर झाड पडून नुकसान झाले. या परिसरात काही झाडे पडल्याच्या घटना घडल्यात. अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेऊन ठिकठिकाणी पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. संध्याकाळी अचानक आभाळ अंधारुन आले व वारा सुटला. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांची त्यामुळे धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे हवेमध्ये काही काळ गारठा निर्माण झाला होता.
साळमध्येही जोरदार हजेरी
साळ परिसरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडीसा दिलासा मिळाला असला तरीही जनजीवन विस्कळीत झाले. सुमारे तासभर पावसाची रिमझिम चालू होती. सुरुवातीला ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि जोरात वारे वाहू लागले. सोबत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले त्यामुळे लोकांची धांदल उडाली. शेतकऱ्यांनी अंगणात वाळविण्यासाठी मिरच्या, हळसांडे, चवळी पसरली होती. त्यामुळे ते सर्व भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर दुचाकीस्वरांचीही मोठी तारंबळ उडाली.
महत्त्वाच्या घटना
चोर्ला घाट परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रत्यावरील झाडे हटवली आणि वाहतूक सुरळीत केली. ठाणे पंचायत क्षेत्रातील हिवरे येथे एका घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. सायंकाळी अचानक आभाळ भरून आल्याने आणि वादळ सुटल्याने दुचाकीस्वारांची मोठी धांदल उडाली.