केतन यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा; भाटीकर कुटुंबीयांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:54 IST2026-05-19T13:54:34+5:302026-05-19T13:54:52+5:30
केतनच्या आत्म्यास तिथे शांती मिळो. इथे आम्हाला शांततेत राहायला द्या.

केतन यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा; भाटीकर कुटुंबीयांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: डॉ. केतन यांच्या निधन झाल्याबरोबरच भाटीकर कुटुंबीयांचा व राजकारणाचा संबंध तुटलेला आहे. आम्हाला कोणालाच राजकारणात कसल्याच प्रकारचा रस नाही. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूचे जे राजकारण सुरू आहे, तो कृपया थांबवावा, अशी मागणी केतन यांचे मोठे बंधू डॉ. कौतुक भाटीकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे.
काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते, प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचा दांडेली येथून परतताना अनमोड घाटात सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत भाटीकर कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनावेळी डॉ. कौतुक यांच्यासह वडील कीर्तीकुमार,
आई कादंबरी व सोनम कौतुक भाटीकर उपस्थित होते. यावेळी कौतुक यांनी म्हटले आहे की, केतनच्या आत्म्यास तिथे शांती मिळो. इथे आम्हाला शांततेत राहायला द्या.
भाटीकर यांच्याबरोबर त्यादिवशी उपस्थित असलेले त्याचे मित्र सुशांत कवळेकर यांचा संदर्भ घेत कौतुक म्हणतात की, 'सुशांत व आमच्या कुटुंबीयांचे नाते काय होते हे फक्त आम्हालाच माहिती आहे. तो केतनच्या मागे खंबीरपणे राहत होता म्हणूनच आम्ही निवांत व निश्चितपणे झोपू शकत होतो. कृपा करून त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा संशय घेऊ नका. केतन जे काही समाजकार्य करत होता, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते त्याचे समाजकार्य पुढे नेण्याचा आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करूया.'
'केतनच्या निधनानंतर गेल्या तीन दिवसांत सोशल मीडियावर एक उद्रेक पाहायला मिळत आहे. त्या गोष्टीचा आम्हा कुटुंबीयांना खूपच मनःस्ताप होत आहे. त्याच्या निधनाबाबत आम्हाला कोणत्याच प्रकाराचा तपास नको आहे. कारण कितीही तपास झाला व तपासात काहीही निष्पन्न झाले तरीही आमचा केतन काही पुन्हा येणार नाही. - कौतुक भाटीकर