पंचायत इमारतींमुळे विकासाला वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:25 IST2026-04-26T10:24:51+5:302026-04-26T10:25:29+5:30
मोर्ले व केरी पंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन

पंचायत इमारतींमुळे विकासाला वेग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : राज्यातील विकास ही न थांबणारी आणि सातत्याने पुढे जाणारी प्रक्रिया आहे. ती अधिक वेगाने राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सुसज्ज पंचायत इमारतींमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मोर्ले व केरी पंचायतींसाठी उभारण्यात आलेल्या नवीन पंचायत इमारती व सभागृहांचे उद्घाटन काल शनिवारी झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, समाज कल्याणमंत्री आमदार डॉ. दिव्या राणे, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, इतर पंच सदस्य, केरी सरपंच नंदीता गावस, दिक्षा गावस, इतर पंचायतीचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आदी उपस्थित होता. नव्या इमारती मिळाल्याने स्थानिकांन समाधान व्यक्त केले.
'सर्वांगीण विकासासाठी योजना'
भाजपाचे सरकार अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्त्वांवर आधारित कार्य करत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नवभारत' संकल्पनेनुसार गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
मोर्ले पंचायतीसाठी सुमारे ६० लाख रुपये पंचायत निधीतून खर्च करण्यात आले असून केरी पंचायतीसाठी दीनदयाळ योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी वापरून सुसज्ज इमारत व वातानुकूलित सभागृह उभारण्यात आले आहे.
या सुविधा स्थानिक नागरिकांसाठी विशेषतः युवक व महिलांसाठी उपयुक्त ठरणार असून रोजगाराभिमुख उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी येथे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डबल इंजिन सरकारमुळे पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला अधिक गती मिळत असल्याचेही मुख्यमंत्री नमूद केले. आमदार दिव्या राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही इमारती पंचायतींना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितले.