येर्रावागूच्या पुलाचे काम रखडले

By Admin | Updated: July 9, 2015 01:45 IST2015-07-09T01:45:43+5:302015-07-09T01:45:43+5:30

मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे.

The work of Yerawarogu bridge was stopped | येर्रावागूच्या पुलाचे काम रखडले

येर्रावागूच्या पुलाचे काम रखडले

नागरिकांना फटका : जीवनावश्यक वस्तूंच्या भावावर झाला परिणाम
श्रीकांत सुगरवार आसरअल्ली
मागील दोन-तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात थातुरमातूर दुरूस्ती करण्यात येणारा येर्रावागू पुलाचे काम पुन्हा रखडले आहे. त्यामुळे ५० ते ५५ गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला असून पूल नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव या गावांमध्ये दुपटीने वाढले आहे. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी पुलाअभावी लांबूनच्या भागातून यावे लागत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. याचा थेट आर्थिक फटका नागरिकाच्या खिशावर पडत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने आसरअल्लीकडे येणारी बससेवा येर्रावागू नाल्यावरचा पूल नादुरूस्त असल्याने बंद केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. एका प्रवाशाकडून दुप्पट ते तिप्पट रक्कम प्रवासी भाड्याच्या नावाखाली वसूल केली जात आहे. २० ते २२ प्रवासी एकाच वाहनात कोंबून भरले जात आहे. दररोज गरज असणारा भाजीपाला, डाळ, तांदूळ, तेल नागरिकांना विकत घेण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. शाळकरी लहान मुलांनाही नाल्यामध्ये पायी जाऊन पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
पावसाळ्याच्या काळात पूर आल्यास पुरातून वाट काढणे विद्यार्थ्यांना कठिण होणार आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेती अवजारे व साहित्यही पूल नसल्यामुळे इतर मार्गाने आणावे लागते. त्यामुळे या साहित्याच्या किंमतीही वाढविण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यावसायिक मालामाल असले तरी नागरिकांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाची गतवर्षी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पाहणी केली होती. आता पूल दुरूस्तीच्या कामासाठी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
सीमावर्ती भागातील गावांना फटका
तेलंगणा राज्याच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली परिसरात येणाऱ्या ५० ते ५५ गावांना येर्रावागू नाल्यावरचा पूल वाहून गेल्याने थेट फटका बसतो. राज्य परिवहन महामंडळ आपली बससेवा तत्काळ बंद करून देते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने नागरिकांची मनमानी लूट करतात. प्रवासासाठीही अतिरिक्त पैसे प्रवाशांना मोजावे लागतात. यामुळे महामंडळाचे नुकसानही होते.

Web Title: The work of Yerawarogu bridge was stopped