गडचिरोलीत रेतीघाटासाठी बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:00 AM2020-10-20T07:00:00+5:302020-10-20T07:00:24+5:30
Gadchiroli News जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव करून विकास कामांसाठी रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव करून विकास कामांसाठी रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष तथा जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, अविनाश गेडाम, रेखा समर्थ यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी १२ वाजता बैलबंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या बैलबंडी मोर्चास येथील इंदिरा गांधी चौकातून सुरूवात झाली. दरम्यान चंद्रपूर मार्गावर अभिनव लॉनजवळ वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चा अडविला. या मोर्चात १०० बैलबंड्या सहभागी झाल्या होत्या. यापैकी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ८० बैलबंड्यांना लॉनच्या मैदानावर थांबविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर २० बैलबंड्या धडकल्या. कारण तेवढ्याच बैलबंड्या नेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, अविनाश गेडाम, लोकेंद्रशहा सयाम, रेखा समर्थ, रूपेश सोनटक्के, नंदू चावला, रोशन नंदनवार, बालाजी भांडेकर, मनोहर बाळेकरमकर, ईश्वर सिडाम, गोपाल आंबोरकर, रमेश वाढई, नरेश वाढई, गोवर्धन वाघाडे, मुक्काजी भोयर, प्रकाश कोराम, रवींद्र निंबोरकर, गुरूदेव काटवे, श्यामराव नैताम, नामदेव बारसागडे, युवराज काटवे, मधुकर धोडरे, सुधाकर धोडरे, सीमा पाराशर, अश्विनी भांडेकर यांच्यासह शेतकरी व बैलबंडीमालक व शेतकरी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून रेती घाट सुरू न झाल्याने विविध शासकीय योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम, ग्राम पंचायत स्तरावरील सीसी रोड, नाली बांधकाम तसेच नव्या इमारतीचे बांधकाम थांबलेले आहे. याशिवाय ज्यांच्याकडे शेती नाही, पोट भरण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. बैलबंडीने रेतीची वाहतूक करून मजुरी मिळविणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेती घाट तातडीने सुरू करून बैलबंडीला प्रत्येकी तीन ट्रीप रेती वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.