आतापर्यंत ५०० रूग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:18+5:30
१३ नवीन लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये आरमोरी येथील ३ एसआरपीएफ जवान, गडचिरोलीतील १ सीआरपीएफ व १ एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील १ पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील १ परिचारिका व १ रूग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्वी कोरोनाबाधित आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील व विलगीकरणात ठेवलेल्या ४ जणांचे तसेच मेडिकल कॉलनीतील एका जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी १३ नवीन कोरोनारुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४४ वर पोहोचली आहे. दरम्यान २ जणांना सुटी मिळाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता ५०० वर पोहोचली आहे. कोणतीही जीवित हाणी न होता कोरोनावर यशस्वीरित्या मात केली जात असल्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती बºयाच प्रमाणात दूर झाली आहे. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या मार्केटमधील बिनधास्तपणा कायम असून त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
१३ नवीन लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये आरमोरी येथील ३ एसआरपीएफ जवान, गडचिरोलीतील १ सीआरपीएफ व १ एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील १ पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील १ परिचारिका व १ रूग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्वी कोरोनाबाधित आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील व विलगीकरणात ठेवलेल्या ४ जणांचे तसेच मेडिकल कॉलनीतील एका जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
शहरातील गजबजलेल्या गुजरी भाजी बाजारात बसणारा एक भाजी विक्रेता पॉझिटिव्ह आढळल्यानंतर या भागातील काही विक्रेत्यांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. पण अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पद्धतीने पालन होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली तरी सोबतच कोरोनापासून मुक्त झालेल्यांचीही संख्याही वाढत आहे. त्यामुळे एकूण सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६४४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५०० जणांनी कोरोनावर मात केली तर एका जणाचा हैदराबाद येथे मृत्यू झाला. त्यामुळे आता क्रियाशिल (अॅक्टिव्ह) बाधितांची संख्या १४३ वर आली आहे. मंगळवारी नवीन दोन कोरोनामुक्त झाले. यामध्ये चामोर्शी व एटापल्ली येथील रूग्णांचा समावेश आहे.
३१ पर्यंत शाळा बंद
प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व कोचिंग क्लास ३१ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र शाळा, महाविद्यालयांत उपस्थित असणे आवश्यक आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या वाढली
कोरोनाचे रूग्ण आता ग्रामीण भागातही आढळून येत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या वाढत आहे. गडचिरोली येथील पोलीस मुख्यालय कॉलनीमधील प्रतापगड इमारत, गोदावरी इमारत, मेडिकल कॉलनी, वनश्री कॉलनीमधील संजीवनी शाळेसमोरचा परिसर, आरमोरी येथील गायकवाड चौक, विठ्ठल मंदिर वार्ड, कोरेगाव टोली, सुकाळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच एटापल्ली शहरात युवराज मानापुरे यांच्या घरापासून सतिश सुल्वावार यांच्या घरापर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले आहे.