आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:31+5:30

वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

Now flood situation due to goosebird | आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

Next
ठळक मुद्देवैनगंगेचे पाणी देसाईगंज शहरात : अनेक मुख्य मार्ग पुन्हा अडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी रात्री १०.३० वाजता गोसेखुर्द धरणााचे २२ दवाजे एक मीटरने व ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजता २२ दरवाजे दोन मीटरने व ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे पाणी देसाईगंज तालुक्यात १२ तासाने व गडचिरोली तालुक्यात १८ तासाने पोहोचले. या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनंगेच्या उपनद्यांना दाब आल्याने देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, आष्टी, गोंडपिपरी हे प्रमुख मार्ग बंद पडले होते. चार दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूर आला होता. आता पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. मात्र आता गोसेखुर्दच्या पाण्याने पूर आला आहे. सततच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प सुध्दा ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे दोन मीटरने तर ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १२ हजार ६८२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुन्हा सकाळी ८.१० वाजता संपूर्ण ३३ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १३ हजार ७३९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी सोडलेले पाणी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. वैनगंगेला लागून अनेक उपनद्या आहेत. वैनगंगा दुथडी भरून वाहू लागल्याने उपनद्यांचे पाणी वैनगंगेत प्रवाहीत होण्यास अडचण निर्माण होऊ लागले. परिणामी उपनद्यांना दाब येऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही ठेंगण्या पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद पडले होते. मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.

देसाईगंजात शिरले पाणी
वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याचा अंदाज पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला आल्याने तहसीलदार डी.टी. सोनवाने, ठाणेदार प्रदीप लांडे यांनी या घरांमधील नागरिकांना रात्रीच जवळपासच्या समाज मंदिरात हलविण्यात आले. पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मोठा पूर आल्यानंतर या ओढ्याला नदीची दाब येते. मात्र काही नागरिकांनी ओढ्यावरच घरे बांधली आहेत. हा दोष निसर्गाचा नसून नागरिकांचा आहे.
बंद असलेले मार्ग
पाल नदीवरील पुलामुळे आरमोरी मार्ग बंद आहे. शिवणी नाल्यावरील पाण्यामुळे गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद आहे. वैनगंगा पुलावरील पाण्यामुळे आष्टी-गोंडपिपरी, कढोली-अनखोडा हे मार्ग मंगळवारी दिवसभर बंद होते. बुधवारी सायंकाळपर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे.

दोघांना वाचविले
तामिळनाडू राज्यातील सेलबान विरप्पन व मधुस्वामी सुयकला हे दोन व्यक्ती गोविंदपूर नाल्यावरील पुरात अडकली असल्याची माहिती कंट्रोल रूमला प्राप्त झाली. त्यानुसार गोविंदपूर नाल्याकडे बचाव पथक पाठविण्यात आले. या पथकाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.

Web Title: Now flood situation due to goosebird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.