मुख्याध्यापक-अधीक्षकाशिवाय मसेलीच्या आश्रमशाळेचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:29+5:30
मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. पण या शाळेत अनेक दिवसांपासून मुख्याध्यापक आणि अधीक्षकच नाहीत. परिणामी तिथे सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या आश्रमशाळेतील राजेश शबेरसिंग कुमरे या सातवीतील विद्यार्थ्याचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने आश्रमशाळेला भेट देऊन वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही. आश्रमशाळेच्या परिसरात अस्वच्छता आहे. एकाच खोलीत १२१ मुलांना कोंबून ठेवले जाते. ही मुले जेथे जेवन करतात व तिथेच झोपतात. जुन्या काळातील शाहाबादी फर्शी आहे. ही फर्शी अनेक ठिकाणी तुटली आहे. फर्शीच्या फटीमध्ये विंचू सारखे लहान सरपटणारे प्राणी राहण्याची शक्यता आहे.
मुले ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नेहमीच ओलावा राहतो. बेड पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी मोठमोठे सौरयंत्र लावले आहेत. मात्र हे मागील अनेक वर्षांपासून ते बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे.
त्या विद्यार्थ्याचा मृत्यू दम्यामुळे?
दोन दिवसांपूर्वी या आश्रमशाळेत वर्ग ७ मध्ये शिकणाºया राजेश कुमरे या विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याला पहाटे रुग्णालयात आणले पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याने शवपरिक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला दम्याचा अटॅक येऊन त्यातच त्याचा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतू सर्पदंश झाल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे नेमका मृत्यू दम्यामुळे झाला की सर्पदंशाने हे गुलदस्त्यातच आहे.