चामोर्शी मार्ग झाला अपघातप्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:50+5:30
चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी-आष्टी महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते. आवश्यक त्या ठिकाणी फलक किंवा रस्ता सुरक्षा रक्षक पर्याप्त प्रमाणात नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णत: कोलमडले आहे.
या मार्गाचे काम सुरू होऊन चार ते पाच महिने झाले परंतु कामाची गती संथ आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी मारणे आवश्यक आहे. पाणी मारले जात नसल्याने धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोरी बांधकाम सुरू असल्याने वाहनालकांना सुद्धा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोणत्याही एका बाजूने खोदकाम सुरू असते तर एक बाजू सुरळीत चालू शकली असती. परंतु कुठे एका बाजूने तर कुठे दुसºया बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू आहे ती बाजू अरूंद असल्याने समोरासमोर वाहने आल्यास साईड देताना अडचण निर्माण होत आहे. तसेच ओव्हरटेक करणेही कठीण झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी फलक लावावे, अशी मागणी आहे.
रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोका
चामोर्शी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आदी तालुक्यांमधील बसगाड्या व इतर वाहने याच मार्गाने गडचिरोलीकडे येतात. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांची रात्रंदिवस वर्दळ राहते. रात्रीच्या सुमारासही वाहनांची ये-जा सुरूच राहते. रस्ता खोदून ठेवला आहे. तसेच फलक लावले नसल्याने वाहने खोदलेल्या रस्त्यात कोसळत आहेत. धूळ उड्याल्याने रात्रीच्या सुमारास समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे एकमेकांना वाहने धडक देण्याचे प्रमाणही वाढले आहे. योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.