RTE ची २५ टक्के प्रवेश सोडत जाहीर! ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चितीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:26 IST2026-04-11T10:25:17+5:302026-04-11T10:26:13+5:30
राज्यात ८,७०१ पात्र शाळांमधील १,१४,८२६ रिक्त जागांसाठी एकूण २,८९,३८५ अर्ज प्राप्त झाले होते

RTE ची २५ टक्के प्रवेश सोडत जाहीर! ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चितीचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आरटीई २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाची सोडत ६ एप्रिल २०२६ रोजी काढण्यात आली असून निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ११ ते २० एप्रिलदरम्यान प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यात ८,७०१ पात्र शाळांमधील १,१४,८२६ रिक्त जागांसाठी एकूण २,८९,३८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार दिव्यांग संवर्गातून ५८२ आणि सर्वसाधारण गटातून १,०५,२२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रतीक्षा यादीत दिव्यांग ३० व सर्वसाधारण ८६,००४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० एप्रिल पासून नोंदणीकृत मोबाईलवर राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत संदेश पाठविण्यात येणार आहेत. मात्र, केवळ संदेशावर अवलंबून न राहता पालकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निवड तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. पडताळणीनंतर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यभरात एकूण १,०५,८११ अर्जांना प्रवेशासाठी निवड मिळाली आहे. मुंबईत एकूण ३२५ शाळांमधून ४,९४१ विद्यार्थ्यांच्या अर्जांची निवड करण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशासाठी निवड
- पुणे - १७,७२८
- ठाणे - १०,५७८
- नागपूर - ६,९९२
- नाशिक - ५,३२६
- मुंबई - ४,९४१
- रायगड - ४,३४५
- जळगाव - ३,३४०
- पालघर - ३,१८३
११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्यात येणार आहेत.
- शरद गोसावी, शिक्षण संचालक, शिक्षण विभाग