‘बाणा’चं पसायदान !

By सचिन जवळकोटे | Published: November 3, 2019 07:04 AM2019-11-03T07:04:41+5:302019-11-03T07:08:00+5:30

लगाव बत्ती

Solapur vidhansabha election 2019; Politics bjp, ncp, congress and shivsena | ‘बाणा’चं पसायदान !

‘बाणा’चं पसायदान !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

यंदा जिल्ह्यात ‘कमळ’वाल्या आमदारांची संख्या ‘दोनाची चार’ झाली. ‘बाण’वाल्यांचे मात्र तेल गेले. तूपही गेले. ‘निवडून येणारऽऽ येणारऽऽ’ म्हणून गाजावाजा करत ‘मातोश्री’वर जमलेले ‘सोपल’ गेले. ‘बागल’ गेले. ‘क्षीरसागर’ गेले. ‘माने’ही गेले. पाचपैकी चार जागा जिंकून ‘कमळ’वाल्यांनी आपली ताकद वाढविली तर सहापैकी पाच जागा गमावून ‘बाण’वाल्यांनी स्वत:चीच गोची करून ठेवली. मात्र एवढी वाईट अवस्था करण्यात नेमका कुणाचा हात होता? ‘ताना’शाही कमी पडली की ‘शिव’शाही संपविण्यासाठी ‘कमळा’ची बुद्धी पणाला लागली ?

रूपाभवानी’ची पदयात्रा...
...‘कमळा’च्या पायघड्या !

‘मध्य’मध्ये ‘महेशअण्णां’नी बंडाचा झेंडा फडकावला, तेव्हा त्यांना म्हणे अपेक्षा होती की, अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ‘मातोश्री’वरून एकतरी कॉल यावा. मात्र मुंबई तर सोडाच, साधं परंड्याहूनही ‘तानाजीरावां’नी त्यांच्याशी संपर्क न साधलेला. मात्र याचवेळी ‘पंत’ अन् ‘दादां’चा संदर्भ देऊन ‘भिऊ नकाऽऽ उभे राहा’, असे कैक संदेश हळूच ‘अण्णां’पर्यंत पोहोचविले गेले. फक्त त्यांनी ‘उत्तर’मधून अर्ज काढून घ्यावा, याची तसदी काळजापूर मारुतीजवळच्या ‘देशमुखांं’नी पद्धतशीरपणे घेतली. ज्यांनी ‘मानें’ना स्टेजवर बसविण्यात धन्य मानलं, त्यांनीच ‘अण्णां’नाही रणांगणात आणलं.
‘इंद्रभवन’मधल्या ‘कमळ’वाल्यांची एक टीम आतून ‘अण्णां’सोबतच होती. कुठं त्याला ‘भाषेच्या आपुलकीची किनार’ होती, तर कुठं ‘बाणाच्या द्वेषाची जोड’ होती. त्यात पुन्हा कधी काळी ‘चंद्रकांतदादां’नी दिलेल्या ‘तयारीला लागाऽऽ’ या वचनाचीही खालच्या कार्यकर्त्यांना आठवण करून देण्यात आली. यामुळंच की काय मुरारजी पेठेतल्या धाकट्या ‘देवेंद्रदादां’नी चक्क ‘नमों’च्या नावानं मतं मागण्याचं खूप मोठ्ठं धाडस दाखविलं. मात्र ‘अण्णां’चं शिंगरू शेवटपर्यंत रेसमध्ये टिकणार नाही, हे लक्षात येताच सुशिक्षित मंडळींनी ‘लंबी रेस का घोडा’ बरोबर ओळखला. अनेकांनी पर्सनल मेसेजमधून एकमेकांना ‘हात’ दिला. नाराज ‘कमळप्रेमीं’ची मतं यावेळी आपल्यालाच मिळणार, हे लक्षात आल्यानं ‘तार्इं’च्या ‘रूपाभवानी पदयात्रेचा सोहळा’ही भल्या पहाटे रंगला. मात्र यामुळंच ‘शाब्दीं’च्या पतंगाला शेवटच्या क्षणी ‘बेस की हवा’ जोरात मिळाली, हा भाग वेगळा. तरीही वाºयाची दिशा फिरली. मतंही फिरली. ‘प्रणितीताई’ हॅट्ट्रिक आमदार बनल्या. कारण इथला एक आमदार वाढला असता तर तिकडं मुंबईत ‘धनुष्य’वाल्यांचा दावा ‘सीएम’ पदावर अधिकच प्रबळ झाला असता. लगाव बत्ती...

सोपलां’ची बार्शी....
.. बदलली सरशी !

बार्शीत तर ‘दिलीपरावां’साठी यंदाची निवडणूक खूप सोप्पी अन् सरळसोट होती. सध्या चलती असलेल्या सत्ताधारी पार्टीची उमेदवारी मिळालेली. सोबतीला ‘आंधळकर’ अन् ‘मिरगणे’ हे दोन्ही पॅटर्नही. आता फक्त विषय एवढाच होता की, ‘निवडून आल्यानंतर कुठल्या खात्याचं मंत्रिपद मागायचं?’ ..परंतु स्टेजवरचे ‘मिरगणे’ सोडले तर पडद्यामागचे छुपे ‘प्रांत-परगणे’ थोडेच त्यांना माहिती होते. मुंबईतून संदेश निघताच अनेक कट्टर ‘हाफचड्डी’वाल्यांनी शेवटच्या दोन दिवसांत कुणाचं काम केलं, हे फक्त ‘राजाभाऊं’नाच ठाऊक.. कारण ‘संघो दक्ष’ची भाषा म्हणे ‘रौतां’च्या चाळीलाही पाठ झालेली. ‘बारामतीकरां’नी इथल्या सभेत दोन-दोन वेळा बोटांनी दोन नंबरची ‘व्हिक्टरी’ दाखवूनही ‘दिलीपराव’ दोन नंबरलाच राहिले. ‘रौतां’वर मतांचा ‘वर्षा’व झाला. विजयानंतर ‘राजाभाऊं’नीही ‘वर्षा’ बंगल्याचीच वाट धरली. हे पाहून युद्धात गुपचूप मिळालेली ‘रसद’ही आतल्या आत सुखावली.. कारण ‘बाणा’चा एकेक उमेदवार पाडून निवडून येणारे अपक्ष आमदार म्हणे ‘पंतां’च्या ‘सीएम’ पदासाठीच फायद्याचे होते. लगाव बत्ती...

आबा’ बनले ‘दादा’मय...
...‘मामा’ही झाले ‘पंत’मय !

यंदा करमाळ्याच्या निवडणुकीनं अनेक नव्या समीकरणांना जन्म दिला. ‘जयवंतरावां’नी आता ‘किंग’ बनण्याच्या भानगडीत न पडता केवळ ‘किंगमेकर’च बनावं, हे जनतेनंच ठासून सांगितलं. ‘तानाजीभैय्यां’चा वट्ट ‘मातोश्री’वर असला तरी इथं जिल्ह्यात सर्वसामान्यांना त्यांच्या निर्णयाशी बिलकुल देणं-घेणं नाही, हेही ‘रश्मीदीदीं’च्या मतांवरून सिद्ध झालं. ‘संजयमामांच्या नशिबात आमदारकी-खासदारकी नाही’ असं नेहमी तोंड वर करून सांगणा-या विरोधकांनाही चपराक मिळाली. राहता राहिला विषय ‘नारायणआबां’चा... यापुढं ‘अकलूजकरां’नी स्वत:च्याच तालुक्यात अधिक लक्ष घालावं. दुस-यांच्या प्रांतात अधिक लुडबुड करूनही काही उपयोग नाही, हेच ‘आबां’च्या पराभवातून स्पष्ट झालं. मात्र ‘कमळ’वाल्या ‘अकलूजकरां’नी ‘बाण’वाल्या ‘बागलां’चा पराभव करून ‘देवेंद्रपंतां’च्या गोटात अजून एका अपक्ष आमदाराचा आकडा त्यांच्याही नकळत वाढवून ठेवला. लगाव बत्ती...

डिलिंग कारखान्याचं...
...मताधिक्य माळशिरसचं !

राहता राहिला ‘मामो’पट्टा. हा तर पूर्वीपासूनच ‘घड्याळ’वाल्यांचाच बालेकिल्ला. गोंधळात पडू नका. ‘मा’ म्हणजे माढा. ‘मो’ म्हणजे मोहोळ. या ठिकाणीही खंजिरांचा खणखणाट झाला. ज्या ‘कमळा’च्या जीवावर ‘काळें’च्या कारखान्याचं ‘कल्याण’ झालं, त्या नेत्याच्या गावात म्हणजे ‘वाडी कुरोली’मध्ये ‘घड्याळ’च ‘लीड’वर राहिलं. ऐन निवडणुकीच्या काळातच ‘अकलूजकरां’चा ‘विजय शुगर’ कारखाना विकत घेणाऱ्या ‘बबनदादां’ना माळशिरसच्या चौदा गावांमध्येही ‘मताधिक्य’ मिळावं, हा योगायोगाचा भाग की अनाकलनीय राजकारणाचा घाट, याचा शोध आता भोळ्या जनतेनंच घ्यावा.. कारण सप्टेंबरमध्येच हा कारखाना विकत घेण्याची प्रक्रिया झालेली; मात्र रक्कम नेमकी मतदानावेळीच भरली गेलेली.
  मोहोळमध्येही ‘नागनाथअण्णां’चा घात स्वकीयांनीच केला. खरंतर, ‘शेजवालां’ची उडी तीन-चार हजारांपुरतीच होती. मात्र ‘सावंतांच्या माणसा’ची मोहोळमधली झेप अनेकांना धोकादायक वाटत होती. म्हणूनच की काय खुद्द ‘कमळ’वाल्या जिल्हाध्यक्षांच्या गावातही ‘घड्याळा’चा गजर झाला. ‘शहाजीं’च्या ‘मार्डी’त ‘पवारां’ची ‘दाढी’ खुदकन् हसली. ‘विजय शेटफळकरां’च्या ‘आष्टी’ पट्ट्यात अन् ‘म्हाडकां’च्या ‘टाकळी’ परिसरातही ‘अनगरकरां’चाच बोलबाला झाला. लगाव बत्ती...

श्रीकांत-केदार’ जोडीची गुगली...
...तरीही ‘शहाजी’बापूंचा षट्कार !

सांगोल्यात मात्र याच ‘शहाजी’बापूंच्या ‘दाढी’नं ‘बाणा’ची उरलीसुरली इज्जत राखली. या ठिकाणीही ‘श्रीकांतदादा’ अन् ‘केदारभाऊ’ जोडी शेवटच्या दोन दिवसांत एवढी अस्वस्थ झाली होती की, त्यांच्या जवळचे अनेकजण फोनवर ‘डॉक्टरऽऽ डॉक्टरऽऽ’च म्हणत होते म्हणे. आता वरून ‘सांगावा’ आल्याशिवाय थोडाच या मंडळींनी ‘युती धर्मा’च्या विरोधात ‘कांगावा’ केला असावा ! असो. तरीही सर्वांच्या नाकावर टिच्चून ‘बापू’ निवडून आले; मात्र स्वकर्तृत्वावर. यात ‘धनुष्या’च्या प्रतिमेचा किती वाटा, हाही संशोधनाचाच विषय. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Solapur vidhansabha election 2019; Politics bjp, ncp, congress and shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.