डाॅ. विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
गेल्या आठवड्यात होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगांनी माखलेले चेहरे पाहून क्षणभर मला वाटले, मी आपल्या वर्तमान राजकारणाचेच ‘प्रत्यक्ष रूप’ पाहतो आहे! खरा चेहरा ओळखणे मुश्कील व्हावे, असेच तर झाले आहे हल्लीचे राजकारण. पूर्वी गुलाल आणि नैसर्गिक रंग वापरले जात, तेव्हा लोक सहज ओळखू येत. आता रासायनिक रंग, डांबर आणि गटारीतल्या चिखलाने भरलेले चेहरे एकसारखेच बेरंगी दिसतात. तुम्ही म्हणाल, होळी तर होऊन गेली; रंगांची चर्चा आता कशाला? तर राजकारण हेच त्याचे कारण आहे. ‘विचारधारा गेली तेल लावत, चला विचारांचे लोणचे घालू या’ हा वाक्प्रचार येथे अगदीसमर्पक वाटतो.
विचारधारा तेल लावत गेली, याचा अर्थ राजकारणात तिचे काहीही महत्त्व राहिलेले नाही. सत्ता मिळो वा न मिळो; आपण आपल्या विचारधारेवर पक्के राहावे ही गोष्ट खूप जुनीपुरानी झाली. हा नवा जमाना आहे. नेत्यांनीही नवा रस्ता धरला आहे. शिवसेनेच्या एका नेत्यांशी अलीकडेच भेट झाली. मी विचारले, ‘पक्ष कसा चालला आहे?’ त्यांनी खिसे चाचपत म्हटले ‘अहो, मी तर सध्या भाजपत आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले. विचारले, ‘काय चालले आहे?’ तर ते म्हणाले, ‘खूप छान चाललं आहे. भाजपसारखा दुसरा पक्ष नाही’. आम्ही सत्तेत राहिलो नाही, तर आमच्या मतदारांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू शकू?, असे त्यांचे म्हणणे होते. माझ्याजवळ बसलेल्या पत्रकार मित्राने विचारधारेचा विषय काढला, तर नेताजी म्हणाले, ‘विचार घेऊन बसलो, तर तरुण वय या संघर्षातच निघून जाईल. विचारांचे काय लोणचे घालायचे? आमची गोष्ट सोडून द्या. राहुलजींचे खासमखास त्यांची साथ सोडून गेले.’ - ही अशा प्रकारची उत्तरे ऐकून मनात येते, हे काय चालले आहे? आजकाल कुणाची चौकशी करण्याआधी ‘सध्या कुठल्या पक्षात आहात?’ हे विचारून घेतलेलेच बरे ! - अर्थात, हा असला प्रश्न डाव्या नेत्यांना मात्र विचारू नये! चीन आणि रशिया यांनी डाव्या विचारांवर तुळशीपत्र ठेवले असले, तरी भारतातल्या डाव्या मित्रांनी मात्र आपल्या विचारधारेचा पट्टा गळ्यात पक्का बांधलेला आहे. ‘डावे होतो, डावे आहोत, डावे राहू’, यावर ते ठाम ! एकेकाळी सगळे विरोधी पक्ष मिळून ज्योती बसू यांना पंतप्रधान करायला तयार झाले होते, परंतु डावे नेते प्रकाश करात आणि हरकिशन सिंह सुरजित यांनी नकाराधिकार वापरला. ‘विरोधी पक्षाशी आमचे विचार जुळत नाहीत, म्हणून ज्योतीबाबू पंतप्रधान होणार नाहीत’, अशी भूमिका त्यांनी घेतली.
विचारधारेच्या बाबतीत ठाम राहण्याकरिता भाजपची मात्र प्रशंसा करावी लागेल. संसदेत केवळ दोन खासदार होते, तेव्हाही भाजपच्या नेत्यांनी विचारधारा बदलली नाही. काँग्रेसचा बोलबाला होता, तेव्हाही राम मनोहर लोहिया, मधू लिमये, मधू दंडवते, मृणाल गोरे यांच्यासारखे नेते आपल्या विचारांसाठी संघर्ष करत होते. त्यांनीही पक्ष बदलला नाही. एन. डी. पाटीलही आठवतात? - ते मोठे शेतकरी नेते आणि नात्याने शरद पवार यांचे मेहुणे. तरीही विचारांच्या बाबतीत सदैव पवारांच्या विरोधात. भारतीय राजकारणात अशी अनेक उदाहरणे सापडतील, परंतु आता काळ बदलला आहे.
अलीकडेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी कुणीतरी मला एक मोठी रोचक गोष्ट सांगितली. कोण कोणाबरोबर आहे आणि कोण कोणाच्या विरुद्ध आहे, हे कळेनासे झाले होते. निवडणुकीच्या वेळी झाले ते तर डोक्याचे दही करणारे प्रकरण होते. बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदेसेनेने एकत्र लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारच्या बरोबर होता, परंतु त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक वेगळी लढवली. ही सगळी समीकरणे पुण्यात पुन्हा बदलली. तेथे भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली. शिंदेसेनाही वेगळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पुण्यात शरद पवारांच्या बरोबर होता, पण नागपूरमध्ये मात्र दोघांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. मुंबईमध्ये काँग्रेसने ठाकरे बंधूंशी नाते तोडले, परंतु पुण्यात हातमिळवणी केली. मुंबईमध्ये काँग्रेसबरोबर निवडणूक लढणारी वंचित बहुजन आघाडी पुण्यात काँग्रेसच्या विरोधात होती. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेले भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी छत्रपती संभाजी नगरात स्वतंत्र नशीब आजमावले. नाशिकमध्ये भाजप स्वतंत्र होता, तर शिंदे आणि पवार एकत्र होते. महापौरपदासाठी अजब-गजब आघाड्या झाल्या. एका भाजपवाल्याने दुःख प्रकट करताना म्हटले, ‘बाहेरून आलेले लोक पक्षात मजा करीत आहेत. आम्ही काय सतरंज्या उचलण्यात आयुष्य घालवावे?’
हल्ली काही लोक रामदास आठवले यांची प्रामाणिकपणाबद्दल प्रशंसा करतात. आठवले उघड सांगतात ‘जे सत्तेत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही राहतो.’ जे खरे ते बोलून टाकतात, लपवाछपवी शून्य. पण, सगळ्यांचे तसे नाही. चेहऱ्यावर लावलेला रंग पापणी लवते न लवते तोच साफ करून टाकतात आणि दुसरा रंग लावतात. दुसरा काढून तिसरा लावतात; वरून मतदारांना सांगतात, ‘तुमच्या भल्यासाठीच मी स्वतःला असे रंगबिरंगी केले आहे.’
आपले काम टाळ्या वाजवणे आहे, हे जनतेला कळते. ती टाळ्या वाजवत सुटली आहे.
Web Summary : Political ideologies are fading as leaders prioritize power. Party switching is rampant, driven by the desire to fulfill voter expectations. While some remain steadfast, opportunism prevails, leaving voters spectators in a colorful, yet confusing, political drama.
Web Summary : राजनीतिक विचारधाराएँ फीकी पड़ रही हैं क्योंकि नेता सत्ता को प्राथमिकता दे रहे हैं। पार्टी बदलना आम बात है, जो मतदाताओं की अपेक्षाओं को पूरा करने की इच्छा से प्रेरित है। जबकि कुछ दृढ़ रहते हैं, अवसरवाद प्रबल है, मतदाताओं को एक रंगीन, फिर भी भ्रमित करने वाले, राजनीतिक नाटक में दर्शक बना देता है।