कोरोनाने मानवी संबंधच धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:19 AM2020-04-30T03:19:58+5:302020-04-30T03:20:18+5:30

सामाजिक दूरतेचा काळ हे वर्ष संपेपर्यंत राहू शकतो.

Corona endangers human relationships? | कोरोनाने मानवी संबंधच धोक्यात?

कोरोनाने मानवी संबंधच धोक्यात?

Next

- डॉ. एस. एस. मंठा
२८ एप्रिलपर्यंत जगभरात कोरोना विषाणूने बाधित लोकांची संख्या ३१,१२,००० इतकी होती आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २,१५,३१० होती. त्यात भरच पडत आहे. आज हयात असलेल्या कोणत्याही पिढीतील लोकांनी महामारीच्या संकटामुळे एवढे लोक मरण पावलेले कधी बघितले नाही. कोरोनानंतरचे जग वेगळेच असेल, असे दर्शविणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. सामाजिक दूरतेचा काळ हे वर्ष संपेपर्यंत राहू शकतो.
जगाचे अर्थकारण गर्तेत गेले असून, त्यामुळे किती प्रमाणात रोजगार हिरावून घेतले गेले हे आजच सांगणे कठीण आहे. अनेक लहान उद्योग दिवाळखोरीत जाऊ शकतात. दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक क्षेत्रे रुळावर येण्यास बराच काळ लागेल. हातावर पोट असणाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी कमालीचा संघर्ष करावा लागणार आहे. सरकारला काटकसरीने खर्च करावा लागेल आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काही चांगले उपाय योजावे लागतील. उत्पादन क्षेत्राला गतिमान करावे लागेल. आता फक्त तंत्रज्ञान हेच आपल्याला एकत्र ठेवू शकेल. डिजिटल व्यवस्थेचा स्वीकार करावा लागणार आहे. कॉमर्स, आरोग्यसेवा, बाजारहाट, शिक्षण, इतकेच नव्हे, तर परस्पर संबंध राखण्यासाठीही डिजिटल तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. पुढचा समाज डिजिटल असेल असे चित्र दिसत आहे. कोरोनाने माणसा-माणसातील संबंधच संपवून टाकले तर मग उरेल काय?


निसर्गाच्या तालावरच आपले जीवन सुरू असते; पण हे निसर्गचक्र काही काळ दूर ठेवल्याने ते आपल्या शरीर व मेंदूला प्रभावित करू शकेल. हालचाल कमी झाल्याने वजन वाढेल व वागणुकीवरही परिणाम होईल. साºया जगात विविध ८७ लाख जीव अस्तित्वात आहेत. त्यापैकी केवळ मानवच स्वत:च्या लाभासाठी प्राण्यांची हत्या करीत असतो, हे स्वातंत्र्य माणसाला कुणी दिलं?
कोरोना विषाणूला वांशिक व देशांच्या सीमा अडवू शकल्या नाहीत. त्याला कोणत्याही धर्माविषयी आणि देवाविषयी दयामाया नाही. हा काही केवळ चिनी विषाणू नाही, तो प्रत्येक राष्ट्राचा स्वतंत्र विषाणू आहे. जगातील २०० हून अधिक राष्ट्रांना त्याने कवेत घेतले असून, त्याचा विस्तार वाढत आहे. मानव स्वत:ला आपल्या भविष्याचा निर्माता समजतो. आपले नशीब आपणच घडवू शकतो, ही त्याची धारणा आहे; पण या विषाणूने दाखवून दिले की, माणसाच्या हातात काहीच नाही, तो कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण एकदा क्लिक करून पैसे हस्तांतरित करू शकतो; पण त्यासाठी जवळ पैसे हवेत ना! ते किती काळ आपल्यापाशी असू शकतील?
या विषाणूमुळे आपल्याजवळ कुणी येऊ नये असे वाटते. कारण, त्यामुळे विषाणूचा संसर्ग होईल याची भीती वाटते. इतकेच नव्हे तर आपला संसर्ग होऊन त्यांना त्रास होईल, अशी भीती वाटते. ही अज्ञानाची भीती आहे. हा अज्ञात शत्रू आपल्याला केव्हा कवेत घेईल याचे भय मनात राहते. हा विषाणू हवेत असेल. आपण वापरतो त्या मोबाईल वा संगणकावर असेल व आपल्याला केव्हाही तो बांधू शकेल, याची चिंता जाणवत असते. आपण सगळे त्याच्या कल्पनेनेच घाबरून गेलो आहोत. काही दिवसांपूर्वी आपण क्षेपणास्त्रांच्या भरवशावर चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करीत होतो. हे सामर्थ्य कशाच्या भरवशावर होते. आपण आताच हतबल का झालोय?
आतापर्यंत आपण एकमेकांच्या संपर्कात होतो. विविध प्रकल्पांचा विचार करीत होतो. स्वत:चे घर बांधण्याचा, जगभर हिंडण्याचा विचार करीत होतो; पण आता अचानक साºयाच गोष्टी आपल्यापासून दूर गेल्या आहेत, असे वाटू लागले आहे. या नवीन उद्भवलेल्या पेचप्रसंगामुळे आपल्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याचा नव्याने बोध होत आहे. अर्थपूर्ण काय व निरर्थक काय आहे, हे समजू लागले आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, क्रिकेट मॅच किंवा नवे स्वयंपाकघर व त्यातील आधुनिक सोयी या गोष्टी आपल्या जगण्यासाठी आवश्यक नाहीत, हेही कोरोना विषाणूने शिकवले आहे. या जागतिक पेचप्रसंगात आपण किती क्षुल्लक व तथ्यहीन आहोत, हे समजले आहे. अशावेळी वैराची भावना सोडून देऊन एकमेकांवर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपल्यापाशी आहे ते ज्यांना मिळत नाही अशांना द्यायला तयार व्हायला हवे. सरकार, डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांच्या भल्यासाठी प्रार्थना करायला हवी. जेथे अश्रूंना थारा नाही, जेथे मृत्यू नाही आणि त्यासाठी होणारा विलाप नाही, अशा नव्या विश्वात आपल्याला नेण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करायला हवे.

आपण क:पदार्थ आहोत, हे आपल्याला समजून चुकले आहे, तसेच आपण सगळे समान आहोत. लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असे सगळे भेद कृत्रिम आहेत. आपल्यातील अहंकार, बुद्धी, चित्त व मानस यांमुळे अंतर्मन उजळून टाकायला हवे. त्यामुळे स्वत:चा शोध घेता येईल आणि शांतता लाभेल. देव सर्वव्यापी आहे, या वास्तवाचे आता आकलन झाले आहे. त्यातूनच निसर्गाशी एकात्मकता साधू शकू, तसेच मानवावर प्रेम करू शकू. यातून अंतिम विजय मानवी इच्छाशक्तीचा होणार आहे. कारण, या विषाणूच्या लागणीतून आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत व आणखी तितकेच बरे होण्याच्या वाटेवर आहेत. आपण आपल्याभोवती ज्या भिंती उभ्या केल्या होत्या, त्या कोरोनामुळे मोडून पडल्या आहेत. त्यामुळे आपल्या आशा-आकांक्षांना आणि प्रगतीला यापुढे कुणी बांध घालू शकणार नाही, हे आपण ओळखायला हवे व हताश न होता निर्धाराने पुढे जायला हवे.
(माजी चेअरमन, एआयसीटीई, सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण)

Web Title: Corona endangers human relationships?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.