मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’वर काळे फुगे का?

By किरण अग्रवाल | Published: September 19, 2019 07:25 AM2019-09-19T07:25:05+5:302019-09-19T07:26:22+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या लोकविकासाच्या कामांची माहिती देत आगामी विधानसभा निवडणुकीतही महाजनादेश मिळवण्यासाठी राज्यात काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात होत आहे.

Article on Are black bubbles on the CM Devendra Fadanvis 'MahaJanadesh Yatra'? in Nashik | मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’वर काळे फुगे का?

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’वर काळे फुगे का?

Next

किरण अग्रवाल

‘प्रामाणिक काम, विकासावर ठाम’ अशी घोषणा देत पुन्हा आपलेच सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर त्यांनीच दत्तक घेतलेल्या नाशकात काळे फुगे सोडण्यात आले, ही बाब कुठेतरी, कुणाच्या तरी मनात दबलेल्या वेदना उघड करणारीच म्हणता यावी. अनुकूलतेच्या परिस्थितीत राजकीय प्रदर्शनांना प्रतिसाद लाभत असला तरी, ते पूर्ण सत्य नाही; एवढा संकेत यातून सत्ताधाऱ्यांना घेता यावा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या लोकविकासाच्या कामांची माहिती देत आगामी विधानसभा निवडणुकीतही महाजनादेश मिळवण्यासाठी राज्यात काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमाच्या पूर्वदिनी सदर यात्रा नाशकात पोहोचली असता, तिचे उत्स्फूर्त स्वागत तर झालेच; परंतु यात्रा मार्गावर काळे फुगेही सोडले गेल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यात याच यात्रेवर कडकनाथ कोंबड्या सोडल्या गेल्याची घटना घडलेली असल्याने नाशकात सरकारी यंत्रणेकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी कांद्याचे निर्यातशुल्क वाढविले गेले असल्याने यात्रेवर कांदाफेकीची धास्ती होती, काही संघटनांनी यात्रा मार्गावर निदर्शने करण्याचा मनोदयही बोलून दाखविला होता. त्यामुळे अशा सर्व संबंधितांना नोटिसा बजावून व काहींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले होते. तरी, काळे फुगे सोडले गेले व ‘मी पस्तावतोय’चे फलक झळकविले गेले. त्यामुळे सारेच काही आलबेल नाही, हेच त्यातून लक्षात यावे.


अर्थात, सत्तेत कुणीही असो; त्याला विरोधक असतातच. उलटपक्षी सबळ विरोधक असल्याखेरीज लोकशाही व्यवस्था मजबूत होत नाही, असे सत्तेतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचेच नेते म्हणू लागले आहेत. तेव्हा, सत्ताधारी नेतृत्वाला विरोधाचा सामना करावा लागण्यात नवे काही नाहीच. पण, ज्या शहराला अशा नेतृत्वाने दत्तक म्हणून व पर्यायाने तेथील नागरिकांनी या नेतृत्वाला पालक म्हणून स्वीकारलेले असते, त्या ठिकाणीही काही आगळीक घडून येताना दिसून येते तेव्हा त्याने आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे एकीकडे उत्स्फूर्त व तेदेखील भरपावसात जल्लोषात स्वागत होत असताना उडवल्या गेलेल्या काळ्या फुग्यांना म्हणूनच दुर्लक्षिता येऊ नये.

फडणवीस सरकार आगामी निवडणुकीला सामोरे जाताना सर्वात उत्तम कामकाज केल्याचे सांगत आहे, त्याचप्रमाणे विकासावर ठाम असल्याची ग्वाही दिली जात आहे; परंतु समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासारखे लक्षवेधी ठरू शकणारे अन्य उत्तम काम दृष्टिपथास पडत नाही. अशातच शिवरायांचा ऐतिहासिक वारसा असलेले गडकिल्ले व्यवसायासाठी मोकळे करून देण्यासारखे निर्णय घेऊन नंतर ते फिरवल्याचे दिसून आले. कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला गेला; पण, त्याबाबतही शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होताना दिसत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. नोटबंदीचा परिणाम अजूनही टिकून असून, व्यापारीवर्गाच्या मोडलेल्या व्यवसायाची घडी बसलेली नाही. कामगार वर्गाचा रोजीरोटीचा झगडा सुरूच आहे तर विचारवंतांमध्ये असहिष्णुतेची भीती मनात घर करून आहे, असे सारे असताना उत्तम कामगिरीचा डंका पिटला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर कसल्या न कसल्या भीतीच्या छायेत किंवा संधीच्या शोधात असलेल्या अन्य पक्षीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षांच्या दारात गर्दी केलेली दिसत असली तरी, काही घटकांत असमाधानाची भावना असल्याचे दिसून येते.



ज्या नाशकात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होऊन पंतप्रधानांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे ते नाशिक शहर फडणवीस यांनी दत्तक घेण्याची घोषणा केल्यानेच नाशिककरांनी भरभरून मते देत भाजपला महापालिकेची सत्ता दिली. परंतु गेल्या दोन-अडीच वर्षात या संस्थेतील सत्ताधा-यांना प्रभावी असे कार्य करता आल्याचे दिसून येऊ शकले नाही किंवा खुद्द मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यानुसार नाशिकच्या पदरात वेगळे काही पडले नाही. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सुरू झालेले अनेक प्रकल्प रेंगाळले. म्हणजे नवीन तर काही पदरात पडले नाहीच; परंतु जुने जे काही सुरू होते तेही खोळंबले. बरे, नाशकातील तीनही आमदार भाजपचेच असले तरी त्यांच्याकडूनही लक्षवेधी काम घडून येऊ शकलेले नाही. त्यांच्या आपसातील वर्चस्व वादाच्या स्पर्धेमुळे नाशिक मंत्रिपदापासून वंचित राहिले. त्यामुळे काहीसा अपेक्षाभंगच नाशिककरांच्या वाट्यास आला. तेव्हा महाजनादेश यात्रेचे नाशकात जरी उत्स्फूर्तपणे व जोरदार स्वागत झाले असले तरी, विकासाबाबत असमाधानाची भावना बाळगून असलेल्यांच्या नाराजीला दुर्लक्षिता येऊ नये. भलेही राजकीय विरोधातून घडले असेल; परंतु महाजनादेश यात्रेदरम्यान काळे फुगे उडविले जाण्याचे प्रकार यामुळेच घडल्याचे म्हणता यावे. तेव्हा यानिमित्ताने उघड झालेली शासनाबद्दलची असमाधानाची लकेर सत्ताधा-यांनी लक्षात घेणे अपेक्षित आहे.

Web Title: Article on Are black bubbles on the CM Devendra Fadanvis 'MahaJanadesh Yatra'? in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.