केळीच्या शेतीतून ‘लाखाचे बारा हजार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:39+5:302021-02-07T04:30:39+5:30

बालाजी आडसूळ कळंब : केळीचे पीक तसे पाहिले तर नाजूक अन् जोखीम जास्त असलेले, परंतु, तितकेच हमखास उत्पन्न देणारे. ...

'Twelve thousand of a lakh' from banana farming! | केळीच्या शेतीतून ‘लाखाचे बारा हजार’!

केळीच्या शेतीतून ‘लाखाचे बारा हजार’!

बालाजी आडसूळ

कळंब : केळीचे पीक तसे पाहिले तर नाजूक अन् जोखीम जास्त असलेले, परंतु, तितकेच हमखास उत्पन्न देणारे. यंदा मात्र घटत्या दराचा मोठा फटका केळीस बसला आहे. एकट्या वाकडी (के) या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गावास लाखो रुपयाचा फटका बसला असल्याने, हमखास उत्पन्न देणारी ही शेती ही ‘लाखाचे बारा हजार’ करणारी ठरल्याच्या प्रतिक्रिया केळी उत्पादकांतून व्यक्त होत आहेत. खरीप व रबी हंगामातील नियमित पिके हे लहरी निसर्गावर बेतलेली आहेत. यामुळे ते पदरी पडतील का, याची शाश्वती ना शेतकऱ्यांना राहिली आहे, ना व्यवस्थेला. यातच थोडेबहुत पाणी असेल, तर उसाची शेती करावी म्हटलं, तर तेथेही एवढं पाणी व कष्ट घालूनही ‘गोडी’ चाखतात ते कारखानदारच. यामुळेच काही प्रयोगशील शेतकरी दीर्घकालीन फळपिकांकडे तर काही अल्पकालीन ‘तरकारी’ या भाजीपालावर्गीय पिकाकडे वळले. मात्र, येथेही लहरी निसर्ग व निर्ढावलेल्या व्यवस्थेचे दुष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडण्यास तयार नाही.

वेगवेगळ्या संकटावर मात करत पीक हाती आले, तर बाजारातील ‘दर’ शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य ‘मोल’ ठरवत नसल्याचे दिसून येत आहे. या सर्वांना मात देणारी शेती म्हणून केळी उत्पादनाकडे पाहिले जाते. जास्त पाणी, मेहनतीचे पीक असले, तरी हमखास व जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून केळीला ओळखले जाते.

यामुळेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या वाकडी (केज) येथील ऊस उत्पादक शेतकरी केळीकडे वळले. मात्र, मोठ्या मेहनतीने फळास आणलेल्या त्यांच्या केळी प्लॉटला दृष्ट लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्माही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चौकट...

उत्पादन जागीच, उत्पन्न मात्र घटले

वाकडी (के) येथील सहा शेतकऱ्यांनी तब्बल २५ एकर क्षेत्रावर केळी पीक घेतले आहे. यात बालाजी पांडुरंग कोल्हे यांचे सहा एकर, अमोल नामदेव कोल्हे यांचे चार, संजय रसाळ यांचे तीन, श्रीराम कुरुंद व भागवत कोल्हे यांचे दोन तर दिगंबर कोल्हे यांचे आठ एकर क्षेत्र आहे. यासाठी एकरी त्यांचा दोन लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे, यासाठी बँकांची कर्जे घेतली. यातून सरासरी २५ ते ३० टनांचे उत्पादन गृहित धरले, तर ७५० टनापेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित होते. वाकडीकरांनी मोठ्या कष्टाने हा पल्ला गाठला खरा. मात्र, त्यांना धक्का दिला तो दराने. गतवर्षी पंधरा ते सोळा रुपये सरासरी दराने गेलेली केळी यंदा तीन ते सहा रुपये दराने जात आहेत. यामुळे वाकडीकरांना लाखो रुपयाचा फटका बसला आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. एकुरका येथील शेतकऱ्यांची गतही यापेक्षा काही वेगळी नाही.

लॉकडाऊन बरं म्हणण्याची वेळ

जून-जुलैची मृगी किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरचा बहर शेतकरी घेतात. काढणी चालू झाल्यावर दराची साथ मिळाल्यास केळी ‘लखपती’ करते, परंतु यंदा लॉकडाऊन ते अनलॉक या कठीण काळात मिळालेला दरही आता मिळत नसल्याने लाखोंचा खर्च करून केलेली शेती आतबट्ट्याची ठरत आहे, असे वाकडी येथील माजी सरंपच व प्रगतशील शेतकरी बालाजी कोल्हे यांनी सांगितले.

Web Title: 'Twelve thousand of a lakh' from banana farming!