उमरगा : ‘श्रम व परिश्रमाच्या आधारे निश्चित ध्येय गाठता येते. यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मबल जागृत ठेवून मनात नैराश्य न आणता चांगुलपणा बाळगावा. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार काही काळापुरताच असून, प्रत्येकाची पहाट होणार आहे,’ असे मत माजी जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील शांतिदूत परिवाराच्या विद्यार्थी, कला-क्रीडा व साहित्य विभागाच्या वतीने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा व विद्यार्थ्यांचे मनोबल’ या विषयावरील ऑनलाईन परिसंवादात शुक्रवारी (दि. ९) ते बोलत होते. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक तथा शांतिदूतचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी मिशन ‘आयएएस’चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे (अमरावती), यशवंत शितोळे, संदीप जोशी, प्रा. युसूफ मुल्ला, योगेश जाधव, अनिता राठोड, महेश जगताप, आदींची यावेळी उपस्थिती होती.
आवडीपेक्षा आपल्या ध्येयाची ओढ आवश्यक आहे. आपले कौशल्य यश संपादन करण्यासाठी वापरा. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. काठोळे यांनी प्रास्ताविक, संदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. युसूफ मुल्ला यांनी आभार मानले. यासाठी योगेश जाधव, अनिता राठोड, महेश जगताप, आदींनी पुढाकार घेतला.