सुनेच्या टोमण्याने घेतला सासू-सासऱ्यांचा बळी; मॉडर्न कपड्यांवरुन वाद, लग्नानंतर कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 20:07 IST2026-05-17T20:05:22+5:302026-05-17T20:07:34+5:30
घरातील एकुलत्या एक मुलाच्या हट्टापायी दिल्लीच्या मॉडर्न मुलीला सून म्हणून घरी आणणं सासू-सासऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे.

फोटो - आजतक
हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नारा गावात एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. घरातील एकुलत्या एक मुलाच्या हट्टापायी दिल्लीच्या मॉडर्न मुलीला सून म्हणून घरी आणणं सासू-सासऱ्यांच्या जीवावर बेतलं आहे. घरातील वाद आणि मानसिक त्रासाला कंटाळून ४६ वर्षीय राजेश आणि त्यांची ४४ वर्षीय पत्नी सुमन यांनी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं आहे.
राजेश आणि सुमन यांचा एकुलता एक मुलगा आशिष सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असायचा. साधारण दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याची भेट दिल्लीत राहणाऱ्या स्नेहाशी झाली. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, तेव्हा आशिषने आपल्या कुटुंबासमोर लग्नाचा हट्ट धरला. मुलाच्या आनंदासाठी आई-वडील तयार झाले आणि जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीत दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं.
मॉडर्न कपड्यांवरुन वाद
लग्नानंतर स्नेहा जेव्हा पानिपतच्या नारा गावात पोहोचली, तेव्हा ती दिल्लीचे मोकळं आणि आधुनिक वातावरण विसरू शकली नाही. स्नेहा अनेकदा मॉडर्न आणि तोकडे कपडे घालायची, पब आणि पार्ट्यांमध्ये जाणं तिच्या जीवनशैलीचा भाग होतं. ग्रामीण पार्श्वभूमीमुळे सासू सुमन आणि सासरे राजेश यांची इच्छा होती की सुनेने ड्रेस किंवा साडी परिधान करावी.
सासू-सासऱ्यांशी गैरवर्तन आणि मारहाण
नातेवाईकांचा आरोप आहे की, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता ती सासू-सासऱ्यांशी गैरवर्तन आणि मारहाणही करायची. या सगळ्यामुळे संपूर्ण गावात आपली बदनामी होत आहे, असं या जोडप्याला वाटत होतं. घरात कपडे आणि राहणीमानावरून पुन्हा एकदा मोठा वाद झाला. आरोप आहे की, वादादरम्यान स्नेहाने सासू-सासऱ्यांना टोमणा मारताना "ज्यांना बघवत नाही... त्यांनी मरून जावं" असं म्हटलं.
लग्नानंतर कुटुंब उद्ध्वस्त
या बोलण्याने अत्यंत दुखावलेल्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या राजेश आणि सुमन यांनी घरात ठेवलेलं विष घेतलं. तब्येत बिघडल्याने दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे आई सुमन यांना मृत घोषित करण्यात आलं, तर सासरे राजेश यांनी रविवारी सकाळी रोहतक पीजीआयमध्ये अखेरचा श्वास घेतला. आत्महत्येनंतर आई सुमन देवी यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्या रडताना म्हणत आहेत की, त्या आपली सून आणि तिच्या माहेरच्या लोकांमुळे प्रचंड त्रस्त आहेत, कोणीही त्यांचे ऐकायला तयार नाही आणि सून गावाच्या पद्धतीनुसार राहण्यास तयार नाही.