बदला घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलनं रचलं ‘असं’ षडयंत्र; जे ऐकून अख्खं नवी मुंबई पोलीस दल हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:14 AM2021-09-14T11:14:31+5:302021-09-14T11:16:36+5:30

रस्ते अपघातात शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला त्यामुळे संशयाला जागा नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली. अपघाताची बातमी पुण्यातील त्यांच्या कुटुंबाला दिली.

Murder Mystery of Police Shivaji Sanap by female constable; Navi Mumbai police was shocked to hear | बदला घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलनं रचलं ‘असं’ षडयंत्र; जे ऐकून अख्खं नवी मुंबई पोलीस दल हादरलं

बदला घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलनं रचलं ‘असं’ षडयंत्र; जे ऐकून अख्खं नवी मुंबई पोलीस दल हादरलं

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी तपासात घटनास्थळाजवळीस CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. जवळपास अडीचशे फुटेज तपासलेबस पकडण्यासाठी ते चालत असताना गाडीने त्यांना टक्कर मारल्याचे फुटेज आढळले. नॅनो कारमध्ये २ लोकं बसलेली दिसली. शिवाजी सानप यांचा मेव्हणा आणि पत्नी यांनी हा अपघात नसून घातपात झालाय असा संशय व्यक्त केला

 नवी मुंबई – अनेकदा आपण ऐकलं असेल एखाद्याचा खून करण्यासाठी सुपारी घेणाऱ्या गुन्हेगाराला शोधलं जातं. परंतु तुम्ही कधी ऐकलंय की, खून करण्यासाठी कुणी आधी लग्न केलंय त्यानंतर स्वत:च्या पतीलाच सुपारी देऊन गुन्हेगार बनवलय. ऐकायला हे अजब वाटत असलं तरी नवी मुंबईत हा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेने बदला घेण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं.

या षडयंत्राप्रमाणे तिने खून करण्यासाठी आधी लग्न केले. लग्नानंतर तिने पतीवर हत्या करण्यासाठी दबाव आणला. इतकचं नाही तर त्याला पैसे देण्याचंही आमिष दाखवलं. या संपूर्ण प्रकारात हैराण करणारी गोष्ट म्हणजे यात खून करणारी एक पोलीस कर्मचारी आणि ज्याचा खून झालाय तोही पोलीस कर्मचारी. जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला तर प्रत्येकजण अचंबित झाला. १५ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी सानप ड्युटी करून पुणे येथील त्यांच्या घरी चालले होते. सानप हे मुंबई पोलीस नेहरू नगर स्टेशन येथे ड्युटीला होते. कामासाठी ते रोज पुणे-मुंबई प्रवास करत होते.

पुण्याहून ते एका बसने पनवेलपर्यंत येत होते. त्यानंतर पनवेलहून दुसरी बस पकडून कुर्ला येथे पोहचायचे. कुर्ला येथून लोकल ट्रेनने नेहरु नगर पोलीस ठाणे गाठायचे. १५ ऑगस्टच्या रात्री कुर्ला स्टेशनहून उतरून पनवेलसाठी बस पकडायला ते रस्त्यावर जात होते. त्याचवेळी एका नॅनो गाडीने शिवाजी सानप यांना जोरदार टक्कर मारली. त्यात सानप गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर जखमी पोलिसाला हॉस्पिटलला उपचारासाठी नेले परंतु त्याठिकाणी शिवाजी सानप यांनी अखेरचा श्वास घेतला.

पत्नीला आला हत्येचा संशय

रस्ते अपघातात शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला त्यामुळे संशयाला जागा नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली. अपघाताची बातमी पुण्यातील त्यांच्या कुटुंबाला दिली. नातेवाईक मुंबईत पोहचले परंतु त्यानंतर शिवाजी सानप यांचा मेव्हणा आणि पत्नी यांनी हा अपघात नसून घातपात झालाय असा संशय व्यक्त केला. एका पोलिसाचा मृत्यू झाल्यामुळे तात्काळ पत्नीच्या संशयावरुन तक्रार नोदवण्यात आली. तोपर्यंत पोलिसांना हा अपघात असल्याचं वाटत होतं. परंतु ज्याठिकाणी सानप यांचा अपघात झाला त्याच ठिकाणाहून काही अंतरावर नॅनो कार जळालेल्या अवस्थेत आढळली. सानप यांचा अपघात कुठल्या गाडीने झाला याची पोलिसांना माहिती नव्हती. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

CCTV फुटेजमधून खुलासा

पोलिसांनी तपासात घटनास्थळाजवळीस CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. जवळपास अडीचशे फुटेज तपासले तेव्हा १५ ऑगस्टच्या रात्री शिवाजी सानप कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडताना आढळले. त्यानंतर बस पकडण्यासाठी ते चालत असताना गाडीने त्यांना टक्कर मारल्याचे फुटेज आढळले. नॅनो कारमध्ये २ लोकं बसलेली दिसली. पोलिसांनी त्यांची ओळख पटवली त्यानंतर समोर आली नवी कहानी. २०१९ मध्ये शीतल पानसरे नावाच्या एका कॉन्स्टेबलने सानपविरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सानप यांच्यावर लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याचा आरोप होता.

शीतल आणि सानप हे दोघंही नेहरु नगरच्या पोलीस ठाण्यात एकत्र कामाला होते. दोघांमध्ये चांगले संबंध होते परंतु अचानक नात्यात कटुता आली. दोघांमध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर शीतलने शिवाजी सानपविरोधात तक्रार दिली होती. ही गोष्ट सानप यांच्या पत्नी आणि मेव्हणा दोघांना माहिती होती. आता शीतल पोलिसांच्या रडारवर आली. पुरावेच काही नव्हते परंतु अत्यंत शिताफीने पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. शीतलचा मोबाईल आणि सोशल मीडिया तपासले. शीतलच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट दिसली. त्यात धनराज जाधव असं नाव होतं. तो बस ड्रायव्हर होता. शीतलने त्याच्याशी मैत्री केली आणि अवघ्या ५ दिवसांत त्याच्याशी लग्न केले. २०१९ च्या अखेरच्या वर्षी हे घडलं. धनराज तामिळनाडूत राहणारा होता. लग्नाच्या एक आठवड्यानंतर शीतलने धनराजला शिवाजी सानपबद्दल सांगितले. सानपचा बदला घ्यायचाय, तू एक ड्रायव्हर आहे. रस्ते अपघातात मृत्यू झाला तर कुणालाही तुझ्यावर संशय येणार नाही असं शीतलने सांगितले. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पुन्हा शीतलने तिच्या सोसायटीतील सिक्युरिटी गार्डच्या मुलाशी मैत्री करत त्याला जाळ्यात ओढलं. पुन्हा संधी मिळताच तिने विशाल जाधवला सानपबद्दल सांगितले. विशाल शिवाजी सानपला मारण्यास तयार झाला. त्यासाठी त्याने मित्र गणेश चव्हाणची मदत घेतली.  शीतलने विशाल आणि गणेश दोघांना ७० हजार रुपये दिले होते. पोलिसांनी अखेर शीतल, गणेश आणि विशाल या तिघांना पकडलं आहे.

Web Title: Murder Mystery of Police Shivaji Sanap by female constable; Navi Mumbai police was shocked to hear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.