आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्सकडून तब्बल १०३ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा पाचवा पराभव असून, या परभवामुळे मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील वाटचाल अवघड झाली आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मुंबईचा संघ सपशेल अपयशी ठरला होता. त्या पार्श्वभूमवर चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या याने खेळपट्टी किंवा इतर कुठलीही सबब न देता पराभवाचं खापर संघाची सुमार फलंदाजी आणि पॉवर प्लेमध्ये केलेल्या खराब खेळावर फोडलं.
सामना आटोपल्यानंतर हार्दिक पांड्या याने सांगितले की, सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स गमावणे आमच्या संघाला फार महागात पडले. पॉवर प्लेमध्ये झटपट विकेट गमावल्यानंतर तुम्ही सामन्यात बॅकफूटवर जाता. या लढतीत आम्ही एकापाठोपाठ एक पडलेल्या विकेट्मुळे निर्माण झालेल्या दबावातून सावरू शकलो नाही.
यावेळी खेळपट्टीबाबत विचारणा केली असता पराभवासाठी खेळपट्टीला दोष देण्यास हार्दिक पांड्याने नकार दिला. तो म्हणाला की, खेळपट्टीमध्ये कुठलाही बदल झाला नव्हता. चेन्नईने याच खेळपट्टीवर दमदार फलंदाजी केली होती. खरंतर २०७ धावांचं आव्हान खूप मोठं होतं. तसेच हे आव्हान पार करण्यासाठी संघाला भक्कम सुरुवात मिळण्याची गरज होती. मात्र ती आम्हाला मिळू शकली नाही, असेही हार्दिक पांड्या याने सांगितले.
काल रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २०७ धावा फटकावल्या होत्या. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला होता. तसेच मुंबईचा संपूर्ण संघ अवघ्या १०४ धावांत गारद झाला होता.