जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:00 IST2026-05-08T14:58:45+5:302026-05-08T15:00:26+5:30
संपत्तीच्या वादात आपल्या नातेवाईकांना अडकण्यासाठी हे भयंकर पाऊल उचललं. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

फोटो - आजतक
दिल्लीजवळ असलेल्या ग्रेटर नोएडातील कासना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका वडिलांवर आपल्या १३ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात असा खुलासा झाला आहे की, आरोपीने संपत्तीच्या वादात आपल्या नातेवाईकांना अडकण्यासाठी हे भयंकर पाऊल उचललं. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरसा गावातील १३ वर्षांचा मुलगा ७ मे रोजी अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला मुलाच्या वडिलांनीच अपहरण आणि कौटुंबिक वादाचा संशय व्यक्त करत नातेवाईकांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
वडिलांवरील संशय अधिक बळावला
तपासादरम्यान पोलिसांना वडिलांच्या सांगण्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि आजूबाजूच्या मुलांकडे चौकशी केली. हळूहळू अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे वडिलांवरील संशय अधिक बळावला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी वडील सतत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत होते आणि वेगवेगळी विधानं करून पोलिसांची दिशाभूल करत होते.
नातेवाईकांना अडकवण्याचा कट
पोलिसांना सिरसा गावातील एका तलावातून मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह मिळाल्यानंतर तपासाला वेग आला. चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, संपत्तीच्या वादावरून कुटुंबात बराच काळ तणाव सुरू होता आणि याच कारणावरून आरोपीने आपल्या मुलाची हत्या करून नातेवाईकांना अडकवण्याचा कट रचला होता.
पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे हत्येची पद्धत आणि इतर तांत्रिक बाबींचा खुलासा केलेला नाही, परंतु हे प्रकरण अत्यंत गंभीर मानून तपास सुरू ठेवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आरोपीची सतत चौकशी केली जात असून लवकरच संपूर्ण घटनेचा सविस्तर खुलासा केला जाईल. या घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण आहे.