BREAKING : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची एटीएसमधून उचलबांगडी; केली गोंदियाला बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:59 IST2021-05-06T19:57:34+5:302021-05-06T19:59:20+5:30
Daya Nayak Transfer : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे.

BREAKING : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची एटीएसमधून उचलबांगडी; केली गोंदियाला बदली
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं आहे. एटीएसमध्ये दया नायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर आता नायक यांची बदली गोंदियामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकपदी करण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक यांना साईडलाईन केल्याचं स्पष्ट होत आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये दया नायक यांची काल मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली. प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली होती. नव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. १९९५ सालच्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र, कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांच्या अंगाशी आलं. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा (एसीबी) ससेमिरा त्यांच्यामागे लागला. गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने नाउमेद झाले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी ते पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाले.
दया नायक यांची कामगिरी
गेल्या वर्षी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्यावेळी धमकीचा फोन गेला होता. त्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपीस अटक केली होती असल्याची माहिती देण्यात आली. पलाश बोस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव होते.