लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:33 IST2026-05-04T13:32:53+5:302026-05-04T13:33:26+5:30
मुजफ्फरपूरमध्ये फसवणुकीने लग्न करण्याचा प्रयत्न फसला. २०० रुपयांची नोट ओळखता न आल्याने नवरदेवाचा भांडाफोड झाला आणि नवरीने पाठवणी नाकारली.

AI Generated Image
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून फसवणुकीचा एक असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात होत आहे. रात्रभर मंगलाष्टके झाली, विधी पार पडले, पण सकाळी पाठवणीच्य वेळी एका २०० रुपयांच्या नोटेने नवरदेवाचा खोटेपणा उघड केला. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरीने सासरी जाण्यास नकार दिला आणि अखेर वरातीला नवरीविनाच रिकाम्या हाताने परतावे लागले.
नक्की काय घडलं?
ही घटना बरियारपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. मनियारी परिसरातून शुक्रवारी रात्री मोठी वरात आली होती. गाणी, नाच आणि उत्साहात लग्नविधी पार पडले. कोणालाही शंका आली नाही की, मांडवात जो मुलगा बसला आहे, तो तो नाहीच आहे ज्याच्याशी मुलीचे लग्न ठरले होते.
एका नोटेने काढला काटा!
शनिवारी सकाळी जेव्हा पाठवणीची वेळ आली, तेव्हा एका महिलेला नवरदेवाच्या वागण्यावर संशय आला. तिने नवरदेवाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिने नवरदेवाच्या हातात २०० रुपयांची नोट ठेवली आणि विचारले, "हे किती रुपये आहेत?" नवरदेवाने ती नोट नीट न पाहताच ती '२००० रुपयांची' असल्याचे सांगितले. २०० आणि २००० रुपयांच्या नोटेतला फरकही नवरदेवाला ओळखता येत नाही, हे पाहून महिलांनी आरडाओरडा सुरू केला. जेव्हा लोकांनी नवरदेवाला जवळून पाहिले, तेव्हा कळाले की ज्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्याऐवजी दुसराच मुलगा बोहल्यावर बसवला होता.
पोलीस दरबारी पोहोचलं प्रकरण
हा प्रकार उघडकीस येताच नवरीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत विदाई थांबवली. आपली मोठी फसवणूक झाल्याचा आरोप करत मुलीने या नवरदेवासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. घटनेची माहिती मिळताच बरियारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर, नवरदेवाला आपल्या वरातीसह अपमानित होऊन रिकाम्या हाताने परत जावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाकडील एका तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.