"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:22 IST2026-01-18T16:22:02+5:302026-01-18T16:22:51+5:30
"आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे..."

"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जर जातीभेद नष्ट करायचा असेल तर, तो प्रथम मनातून नष्ट करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. भागवत म्हणाले, "सुरुवातीला याचा संबंध व्यवसाय आणि कामाशी होता. मात्र नंतर, समाजात शिरली आणि भेदभावाचे कारण बनली." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त या चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेरावही व्यासपीठावर उपस्थित होते.
जातीभेद नष्ट करण्यासाठी, तो मनातून नष्ट करणे आवश्यक -
जातिभेदाच्या समस्येवर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले, "हा भेदभाव दूर करण्यासाठी, मनातून जातीभेद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर १० ते १२ वर्षांत जातिभेद संपेल." श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भागवत म्हणाले की, संघाचे उद्दिष्ट भारताला त्याचे सर्वोत्तम वैभव परत मिळवून देणे आणि समाजाला सोबत घेऊन जाणे आहे.
आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर संघाच्या शाखांमध्ये यावे -
सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, "आरएसएस व्यक्तीच्या चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्र उभारणीसाठी काम करते आणि ही काही प्रतिक्रिया म्हणून स्थापन झालेली संघटना नाही अथवा कुणाशी स्पर्धाही करत नाही. आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे. आरएसएस स्वतःला मोठे बनवू इच्छित नाही, तो समाजाला मोठे बनवू इच्छिते." एवढेच नाही तर, "जर लोकांना आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी संघाच्या शाखांमध्ये यावे, असेही भागवत यावेळी म्हणाले.